Archive for the ‘विचार’ Category

टर्निंग पॉईंट

म्हणजे निर्णायक टप्पा जेथून नवे वळण मिळते असा महत्त्वपूर्ण क्षण, कलाटणी देणार क्षण म्हणू आपण हवं तर…
थांबा थांबा घाबरून जाऊ नका आणि असं तर अजिबात वाटून घेऊ नका की आज अचानक एवढे जड शब्द वापरून ही काय ज्ञानाचे डोस पाजणार आहे…

निर्णायक टप्पा म्हणजे टर्निंग पॉईंट हा झाला शब्दशः अर्थ.
पण असे टप्पे आपल्या आयुष्यात अनेकदा येतातच ना,
प्रत्येक वेळी काही अगदी कलाटणी देणारा क्षण किंवा फार मोठी घटनाच असते असं काही जरुरी नाही, की ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणू.
ती एखादी छोटीशी पण विलक्षण बदल घडवणारी घटना असू शकते, जी आपल्या विचारांची दिशाच बदलून टाकते किंवा एखादं वाचनात आलेलं पुस्तक असू शकतं जे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं किंवा कोणी व्यक्ती असू शकते जी जणू सकारात्मकतेने भरलेला झरा असते आणि तिच्या नुसत्या भेटल्याने आपण खूप बदलून जातो, स्वतःला नव्याने उमगतो…
असेच काही स्वतःला बदलायला लावणारे, विचार करायला लावणारे प्रसंग, घटना, पुस्तके, व्यक्ती अलीकडेच आयुष्यात आल्या की ज्यामुळे अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यात खूप चूक करतो rather अतिशय चुकीच्या व्यक्तीजवळ मनमोकळ करतो, त्यांना आपलं मानतो आणि मग एकदम जोराचा झटका बसून डोळे उघडतात…
सुरुवातीला खूप त्रास होतो अयोग्य व्यक्तीवर विश्वास टाकल्याचा, पण हा अनुभव खूप काही देऊन जातो.

पण अशातच काही नवीन चांगल्या मैत्रिणीही मिळाल्या. त्यातल्या दोघींनी तर मनात खूप खास अशी जागा निर्माण केली.
मुळातच मैत्रीप्रिय स्वभाव असल्याने तशा खास जवळच्या खूप मैत्रिणी आहेतच आयुष्यात, प्रत्येकीची मनात वेगळी जागा, वेगळा कप्पा आणि तो तसा ठेवताच यायला हवा. त्यातच खरी गंमत आहे.
पण या दोन नवीन मैत्रिणीं सोबत खूप वेगळ्याच level चे सूर जुळले,
रोज भेटतात बोलतात असं काही नाही पण जेव्हा समोर येतात तेव्हा full of positive vibes….
त्यामुळे मन एकदम शांत, प्रसन्न आणि आनंदी होतं,
no gossiping just निखळ आनंद.
आधी मी अनेक लोकांच्या वागण्या-बोलण्याचा विनाकारण त्रास करून घेत असे, पण अशा काही मैत्रिणी आयुष्यात आल्यावर लक्षात आलं की आता आपणच आपलं brain boosting करून स्वतःला बदलायला हवं.
मग मन त्रस्त करणारे विचार, व्यक्ती आणि विषय यापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवायला सुरुवात केली आणि हळूहळू जमायला लागलं की हो.
आवडायला लागलं कारण आपला आनंद हा आपल्यावरच अवलंबून असतो आणि तो आपला आपणच शोधायचा असतो.

सुखी तर अनेक जण असतात पण सुख म्हटलं की त्या पाठोपाठ दुःख आलंच. त्यापेक्षा आनंदी राहणं केव्हाही चांगलं, कारण आनंदाला विरुद्ध शब्द नाही

तशी मला काही पुस्तक वाचण्याची खूप अशी आवड नाही, पण ठराविक विषयांची ओढ मात्र खूप आहे, जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
अशातच दादाने सुचवलेले एक पुस्तक वाचनात आले डॉ. प वि वर्तक यांचे पुनर्जन्म हे पुस्तक.
प्रचंड गूढ आणि क्लिष्ट असं वाटणाऱ्या या विषयावर त्यांनी scientific reasoning and examples देऊन पुनर्जन्म, आत्मा-परमात्मा, कर्म-पूर्व कर्म व त्यांचे फळ या अनेक गोष्टी खूप सोप्या करून सांगितले आहे.
खरंच हे पुस्तक परत परत वाचावेसे आहे, प्रत्येक वेळी नवनवीन आणि विलक्षण अर्थ उलगडत गेला,
त्याच्याच जोडीला हिराबाई ठक्कर यांचे कर्माचा सिद्धांत हे देखील वाचले आणि डोक्यात नवीन विचारांचे चक्र सुरू झाले.

ठराविक विषय आणि विचार मनापर्यंत कानापर्यंत पोहोचूच द्यायचे नाहीत अशी सवय केली आणि खूप छान वाटायला लागलं.
Detached attachment ठेवायला सुरुवात केली.

कारण इथे आपण कोणालाच बदलू शकत नाही, जो तो आपापला विधीलिखित घेऊन जन्माला येतो, तो जे वागतो जगतो ते त्याच्या पूर्वकर्मानुसारच,
त्यासाठी दुसरे कोणीच जबाबदार नसते, आपण त्यांना बदलूही शकत नाही आणि कुणाच्या वाट्याचं जगूही शकत नाही, मग त्रास तरी का करून घ्यायचा…
आयुष्यात करण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा विचार करूया, त्याच्यासाठी वेळ देऊ या…

हा असा साधा सोपा बदल मी जर करू शकते तर तुम्ही करू शकता…
बघा एकदा विचार करून ….
तुमच्या पण आयुष्यात असा टर्निंग पॉईंट आला असेलच ना, एखाद्या घटनेच्या, पुस्तकाच्या किंवा व्यक्तीच्या रूपात…
नक्कीच तो उलगडून बघा स्वतःला बदलून बघा

सौ. मानसी गोडबोले.
https://amzn.in/d/56gO9v9 – कर्माचा सिद्धांत

मन संवाद | ३, ४ श्लोक

मनाचे श्लोक ३

प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढे वैखरी राम आधी वदावा |
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ||३||

जगात जे जे चांगलं आहे ते राम तत्त्व आहे
संकल्प चांगला विचार चांगला तर आयुष्य चांगलं

आपण रात्री झोपतो तेव्हा ज्या गोष्टीचा विचार करत असतो तीच गोष्ट दुसऱ्या दिवशी carry केली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच विचारापासून नवीन दिवसाला सुरुवात होते असं मानसशास्त्र सांगतं. तेव्हा कुठच्याही प्रहरी वाईट विचार येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
रात्री झोपताना राम नाम घेतले तर दिवसा आपसूकच रामनामाने सुरुवात होईल.

‘पुढे वैखरी राम आधी वदावा’
म्हणजे काय?
तर वैखरी म्हणजे जिभेचे टोक,
ह्या जिभेच्या टोकावर सतत जर राम नाम म्हणजेच राम तत्त्व म्हणजे पॉझिटिव्ह आणि चांगले विचार, चांगली भाषा असेल तर प्रत्येक आचरण हे कायम सदाचरणच होईल.

मनाचे श्लोक ४

मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुद्धी नको रे |
मना धर्मता नीति सोडू नको हो |
मना अंतरी सार विचार राहो || ४ ||

आता याचा अर्थ बघताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत.
एक बाजू राम आहे
तर दुसरी बाजू रावण,
संकल्प म्हणजे राम
विकल्प म्हणजे रावण,
सद्बुद्धी म्हणजे राम
कुबुद्धी म्हणजे रावण.

आजूबाजूला जेव्हा कोणतीही घटना घडते, चांगली अथवा वाईट
त्याचा पहिला आघात हा मनावर होतो. त्यामुळे त्या मनाला स्थिर करा.

अशांत मन काय करते,
वाईट विचार करते, त्यामुळे कर्म देखील वाईट होते.
परंतू मन शांत असेल तर चांगला विचार करेल आणि कृतीदेखील योग्य म्हणजे चांगलीच होईल.

मनामध्ये पापबुद्धी जागृत होऊ नये, त्याने ethics सोडून म्हणजे नीतिमत्ता सोडून वागू नये आणि सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावा हे मनाला सतत सांगावे.
आणि आपल्या अंतरात राम-तत्त्वानेसारासार विचार करावा.

पालकत्व

पालकत्व

आई-बाबा होणे हे एक वेळ सोपे आहे मुलांचे पालक होणे हे तितकेच कठीण आणि आव्हानात्मक आहे. #मा_आ_वि #पालकत्व #नाते #मैत्री

चांगले पालक होण्यासाठी कोणतीही शाळा नाही, नियमावली नाही, कोणीही आदर्श नाही, कारण प्रत्येक पालक आणि त्यांचे मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. बाळाच्या जन्मापासूनच आई-वडील उत्तम पालक होण्याचा प्रयत्न सुरू करतात. घरातल्या वडीलधाऱ्यांचा अनुभव, आपल्या वयाच्या मित्र-मैत्रिणींचे अनुभव, इंटरनेटवर उपलब्ध माहिती यातून अधिकाधिक प्रगल्भ होत जातात. एवढी सगळी तयारी करून प्रत्यक्ष मुलाचा स्वभाव, विचार करणे, त्यांची प्रतिक्रिया देण्याची पद्धत याचा अंदाज घेत घेत तेही मुलांकडून शिकत शिकत त्यांना चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी झटत असतात आणि आपली भूमिका निभावत असतात.

आई-वडील किंवा पालक म्हणून काय करणे अपेक्षित आहे हो?

तर मुलांचे शारीरिक, मानसिक भावनिक संरक्षण संवर्धन आणि वाढ यावर लक्ष केंद्रित करणे. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद अचानक येणाऱ्या संकटांसाठी आणि समृद्ध भविष्यासाठी तरतूद हे सर्वच ह्यात येते. पण तेवढेच पुरेसे नसतं. त्या त्या वयात किंवा वाढीच्या टप्प्यावर म्हणजे अर्भक शिशु बाल्य बालक विद्यार्थी पौगंडावस्थेतून मग तारुण्य या सगळ्या वाळणांवर पालकांची भूमिका ही बदलती असली पाहिजे. त्या त्या अवस्थेच्या गरजा ओळखून त्यांनी वागले पाहिजे.

अगदी सुरुवातीच्या काही टप्प्यांमध्ये मुलांचं मन इंद्रिय मेंदू हे प्रचंड संस्कारक्षम असतात. आजूबाजूला घडणाऱ्या लहानसहान गोष्टी ते अचूक टिपत असतात, त्यातूनच ते खूप काही नकळत शिकत असतात. घरच्या मोठ्या माणसांचे एकमेकांशी वागणे बोलणे ते पाहतात तेव्हा घरात जे वातावरण त्यांना मिळते त्यावर त्यांच्या जडणघडणीचा पाया रचला जातो. एकाच घरात मुलगा-मुलगी यात भेद न करणे, लाडका-दोडका ही वागणूक न देणे, मुलगा आहे म्हणून विशेष वागणूक न देणे, मुलगा असला तरी घर कामात प्रवृत्त करणे, घरातील महिलांना मग ती घरीच असो किंवा कमावणारी, तिला आदराने, सारखे पणाने, सन्मानाने वागवणे या सर्व गोष्टी घरातल्या इतर मंडळींनी पाळल्या तर ते मूलही आपोआपच शिकेल तसं वागायला. कारण ते वयच आहे तसं, मुलं प्रचंड निरीक्षण करून आणि बारकाईने आपल्या गोष्टी न्याहाळत असतात. तेव्हा पर्यायाने आपली जबाबदारी वाढते. आपली प्रत्येक कृती त्यांच्या मनावर संस्कार घडवत असते. चांगलं वागणं, नीट बोलणं, पावित्र्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा, स्नेह, बुद्धीचा योग्य वापर असे एक ना अनेक सद्गुण वाढीस लागण्यासाठी आधी पालकांनी तसे वर्तन केले पाहिजे. या सगळ्यातून एक चांगली व्यक्ती तर घडेलच पण त्याच बरोबर समाजाच्या प्रति जागरूकता, पर्यावरणाविषयी प्रेम आणि देशासाठी प्रचंड अभिमान हेदेखील त्यांच्या मनात रूजले पाहिजे.

पैशांची, वस्तूंची आणि मुख्य म्हणजे माणसांची किंमत कळली पाहिजे. कधी मुलांच्या हातून एखादी चूक घडली तरी प्रेमापोटी विसरून जावं, पण कटाक्षाने ती चूक परत होणार नाही यावर लक्ष द्यावं आणि तशी समज देखील द्यावी. एका टप्प्यावर आई-वडील हे मुलांचे जणू मित्र होतात, त्यांच्यात वेगळेच नाते निर्माण होते. ह्या आदरयुक्त मैत्रीत थोडा धाक आणि काही लिमिट मात्र हवेत. या काळात नातं मैत्रीचं असावं, पण पालकांचे वागणे पारदर्शी असावं. त्यामुळे मुलं आपोआप शहाणी होतात. मुलांच्या चुकीची जाणीव करून द्यायचा आणि त्यांच्या चांगल्या कामाबद्दल शाबासकी द्यायचा हा काळ. मुलांना आई-वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे असा हा काळ आणि मग ह्या आदरयुक्त प्रेमातून मुलं आपल्या पालकांना आदर्श मानून लागतात.

हळूहळू उच्च शिक्षणाचे महत्त्व, योग्य करिअरची निवड, त्यासाठी प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी, धडपड करण्याची तयारी, अपयश पचवण्याचे धैर्य आणि फायनल गोल साध्य करण्याचे बळ यातूनच नवी पिढी घडते. सुजाण पालक नक्कीच सुजाण नागरिक घडवतात.

तेव्हा नव-पालकांनो – सजग राहा, सतर्क राहा.
नवीन पिढीसमोर सोशल मीडिया, इंटरनेट ऍक्सॅसिबिलिटी, फ्रीडम, following, followers अशी खूप प्रलोभनं आहेत. खूप लहान वयात गरजेपेक्षा जास्त पुढे जाऊन वागणारी ही पिढी आहे. शारीरिक आकर्षण, व्यसनांची चटक, चुकीची संगत, करियर इंसेक्युरिटी, अपयश पचवण्याची क्षमता कदाचित नसणे असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात आहेत. या सगळ्यातून सावरण्यासाठी भावनिक मैत्रीपूर्ण नाते संबंध असावेत. फॅमिली लाईफ, फ्रेंड सर्कल असावे, नात्यांचे मोल जाणलेच पाहिजे, प्रत्येकातलं चांगलं घेता आलं पाहिजे, आनंदी-सुखी जीवन जगता आलं पाहिजे, चारित्र्य जपून नीतिमत्तांचं काटेकोर पालन करून समृद्ध होता पाहिजे.

यासाठी पालक निर्व्यसनी, निर्लोभी, निष्कलंक असावेत. तरच निकोप संतती निपजली जाईल. #मा_आ_वि #पालकत्व #नाते

लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् ।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् ॥

सुभाषित

वयाच्या पाच वर्षांपर्यंत मुलाचे लाड करावे. पुढची दहा वर्षे तिला/त्याला (शिस्त लागावी म्हणून) मारावे (शाब्दिक चालेल, चाबकाने फोडायची गरज नाही). मुल सोळा वर्षांचे झाल्यावर (म्हणजे वयात आल्यावर, कर्तासवरता झाल्यावर, बापाचं पायताण मुलाला यायला लागल्यावर व. व.) त्यांच्याशी मैत्री करावी (त्याला बरोबरीने वागवावे)

मनसंवाद | १, २ श्लोक

मनाचे श्लोक हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी स्पर्धेसाठी पाठांतर म्हणून शिकलेच आहेत. आता शिकूया जगण्यासाठी, अर्थ समजून घेण्यासाठी,नव्या पिढीला मनाने खंबीर बनवण्यासाठी.

तुमच्यापैकी अनेक जणांनी कदाचित श्री.समीर लिमये हे नाव ऐकले असेल. त्यांचा “कॉर्पोरेट कीर्तन” हा कार्यक्रम फारच सुंदर आहे. नवीन पिढीच्या भाषेत ते खूपच मार्मिक उदाहरणे देऊन श्री समर्थ रामदासांचे विचार – कार्य आणि दासबोध आणि मनाचे श्लोक ह्याचे माहात्म्य खुलवून सांगतात. त्यातून त्यांनी मनाच्या श्लोकांचा अर्थ फारच सुंदर आणि सोप्या शब्दात उलगडून सांगितला आहे. त्यांचा YouTube चॅनल आहे.

मी त्यांच्याच ‘ मनकीर्तन ‘ ह्या युट्यूब सिरीजचा लॉक डाउनच्या काळात अनुभव घेतला. त्यानंतर त्यावर थोडासा वाचन, मनन, चिंतन करून मला उमगलेला अर्थ मी इकडे मांडणार आहे.

श्लोक १ ला

गणाधीश जो ईश सर्व गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ।।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ अनंत या राघवाचा ।। १ ।।

मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक १
मनाचे श्लोक १

गणपती म्हणजे बुद्धीची देवता आणि शारदा म्हणजे वाचा. सर्व गुणांचा अधिष्ठाता गणपती आणि आपली वाणी म्हणजे शारदा देवी ह्या दोघांमुळे आपण एकमेकांशी संवाद साधत असतो. म्हणजेच आपण एखादी गोष्ट जेव्हा समोरच्याला सांगतो तेव्हा त्याला ती grasp होते म्हणजेच समजते ती बुद्धीची देवता गणपतीमुळे आणि आपण बोलू शकतो म्हणजे आपली वाचा ती आहे शारदा देवीमुळे.

अश्या ह्या गणेशाला आणि शारदेला श्री समर्थांनी पहिल्या श्लोकातून वंदन केले आहे. #मा_आ_वि #मनाचे_श्लोक #१

श्लोक २ रा

मना सज्जना भक्ती पंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।।
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे ।
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ।। २ ।।

मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी
मनाचे श्लोक २
मनाचे श्लोक २

ह्या श्लोकात समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत की ” हे मना, तू सज्जन हो.” म्हणजे केवळ चांगले आणि चांगलेच विचार कर. जेणेकरून मनातील negativity म्हणजेच नकारात्मकता दूर होऊन सतत positivity म्हणजेच सकारात्मकता राहील.
तुझी वागणूक नेहेमी अशी ठेव की जी जगाकडून नावाजली जाईल, कोणतेही कार्य प्रसन्न मनानेच आणि प्रामाणिकपणे कर. कधीही निंदनीय किंवा अयोग्य असे आचरण करू नकोस.

निर्मळ मनाने ईश्वरभक्ती करत राहा म्हणजे ‘श्रीहरी’ तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होईल. #मा_आ_वि #मनाचे_श्लोक #२

क्रमशः

मनसंवाद | प्रस्तावना

मनाचे श्लोक याद्वारे मनाशी संवाद
मन संवाद

आपण ज्या युगात आज जगत आहोत, त्यात येणाऱ्या सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी जर आपल्याला कशाची आवश्यकता असेल तर ती खंबीर मनाची आणि मन संवादाची. आपल्या या अत्यंत चंचल अशा मनावर संस्कार घडवून त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आणि कणखर बनवून आपल्या तसेच पुढील पिढीला सक्षम बनवण्यासाठी श्रीसमर्थ रामदासांनी २०५ मनाचे श्लोक रचले आहेत.

हे मनाचे श्लोक दुसऱ्यांना उद्देशून सांगावयाचें नसून स्वतःच्या मनाला सांगण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी आहेत. #मा_आ_वि, #मनाचे_श्लोक

हे लक्षात घेऊन आणि त्याचा अर्थ समजून जेव्हा वाचतो तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असेल. समर्थांनी या सुंदर अशा मनाच्या श्लोकांतून भिरभिरणाऱ्या मनाला वरचेवर जागेवर आणण्यासाठी राम नाम हा सर्वार्थाने एकच उपाय असे सांगितले आहे.

जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतःसोबत भय, भ्रम आणि संशय घेऊन जन्माला येतो आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण बनते. आपण कमवलेले नावलौकिक, संपत्ती तसेच आपल्या अंगी असलेले कर्तृत्व, बुद्धिमता, सौंदर्य ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या मानतो किंवा आपण कमावलेल्या आहेत असा आपल्याला भ्रम असतो. कधी कधी तर ह्या गोष्टींचा गर्व होतो, जो आपल्याला विनाशाकडे घेऊन जातो. हे सर्व माझे आहे या भ्रमातून मग भय निर्माण होते. भर्तृहरि यांनी नीती शतकं मध्ये सांगितले आहे:

भोग रोगभयं कुले च्यूतिभयं वित्ते नृपालाद् भयं
माने दैन्यभयं बले रिपुभर्य रूपे जरायाः भयम्
शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद् भयं
सर्व वस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम्

भर्तृहरि, नीति शतक

प्रत्येक गोष्टीला कशाचे तरी भय असते, जसे श्रीमंताला संपत्ती नाशाचे, बुद्धिवानाला आपल्यापेक्षा विद्वांनांसमोर हरण्याचे, सुंदर स्त्रीला वृद्धत्वाचे. मनाचे श्लोक आपल्याला शिकवतात पण यातले काहीच आपले नसते. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा कर्ताकरविता असतो तो फक्त राम, आपण फक्त निमित्तमात्र असतो.

याचे मला सुचलेले उदाहरण: न्यूटनने सफरचंद पडतांना पाहिले तेव्हा त्याला कळले की गुरुत्वाकर्षण या पृथ्वीच्या शक्तीमुळे ते घडते परंतु यापूर्वी सफरचंद झाडावरून पडत नव्हते का हो? परंतु या घटनेमागचे कारण समजावण्याची दृष्टी होती न्यूटनकडे. ही दृष्टी त्याला कोणी दिली? तर भगवंताने. त्या रामानेच. तो स्वतः माणसांना सिलेक्ट करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून काम करवून घेत असतो.

आपलं मन, भय आणि भ्रम यांच्यापाठोपाठ आपल्याला घेऊन जातं ते संशय या अजून एका प्रवृत्तीकडे. आणि मनात एकदा कोणत्याही गोष्टीविषयी किंवा व्यक्तीविषयी संशय भरला की मग वाट चुकतेच विचारांची. हे जे भय, भ्रम आणि संशय यांच्यात गुरफटलेलं आपलं मन आहे त्याला योग्य दिशा देणारे असे हे समर्थ रामदासांनी रचलेले मनाचे श्लोक. ह्या २०५ श्लोकांमधून त्यांनी मनासोबत संवाद साधला आहे.

आपण पहिल्या दहा श्लोकांचा थोड्या-थोड्या टप्प्याने अर्थ पाहणार आहोत.
(क्रमशः)

रामरक्षा

रामरक्षा

रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु “स्वानुभव” ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.

आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

– रामरक्षा स्तोत्र

हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. (पूर्ण रामरक्षा येथे मांडली आहे किंवा विकिपीडियावर ही सापडेल)

घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा,
कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,
प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा,
रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा,
पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा,
नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा…

कुठल्याही संकटात असाल,
फारच निगेटिव वाटतंय,
आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय,
खूप वाईट वाटतंय,
रडायला येतंय,
एकटं वाटतंय,

रामरक्षा म्हणा…

कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शीवणार नाहीत..आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण विज्ञानवर असेल तोच रामरक्षेवर ठेवा.

मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही.

पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा.

तुम्हाला रामरक्षा म्हणून काही अनुभव आला आहे का?

प्रत्येकाला अनुभव येईलच असे नाही आणि आला तरी तो पूर्ण जाणवेल असे नाही. पण जेव्हा अनुभव येतो आणि जाणवतो तो आंतरिक शक्ति देऊन जातो. असा अनुभव खाली कमेन्ट मध्ये नक्की लिहा

।। श्रीराम जय राम जय जय राम।।

@सौ मानसी निखिलेश गोडबोले

आयुष्याची शाळा

प्रश्न: शिक्षण म्हणजे काय?
शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे, जी माणसाच्या जन्मापासून सुरू होते, ती अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते.खरंतर जन्मापासून म्हणजे आईच्या उदरात असताना पासूनच बर का. आईच्या उदरात जेव्हा जीव जन्म घेतो तेव्हापासून आई जे अन्नसेवन करते त्यावर तो वाढायला लागतो. तिचा स्वभाव, त्याची प्रवृत्ती, तिची मनस्थिती, तिचं वागणं, बोलणं, विचार करणं ह्या सगळ्याचे नकळतपणे त्याच्यावर संस्कार होत असतात.

पुढे जसजसे बाहेरच्या जगात आपण जातो अनुवंशिकतेने आलेले स्वभावगुण, आईची शिकवण, गुरूंकडून लाभलेले शालेय शिक्षण, व्यवहारज्ञान, सामाजिक बांधिलकीची जाणीव, देशाविषयी प्रेम, एक सुजाण नागरिक म्हणून असलेली जबाबदारी हे हळूहळू आपण आत्मसात करत जातो. शिकत जातो. 

त्याचप्रमाणे कुटुंबाचा एक घटक म्हणून स्त्री-पुरुष भेदभाव न बाळगता आणि कोणत्याही कामाविषयी कमीपणा न वाटून घेता, संसाराची जबाबदारी पार पाडायला शिकतो. 
हे सर्व आपण आपल्या आईवडिलांकडून आणि घरातील इतर वडीलधाऱ्यांकडून शिकत असतो,कसं वागावं हे जसं समजणं गरजेचं आहे, त्याच प्रमाणे कसं वागू नये हे देखील समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. 

आपल्याला येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवातून आपण शिकत असतो. कधीकधी अपयश येतं, ते तर खूप काही शिकवून जातं, कधी मानसिक तणाव तर कधी शारीरिक दुखणे, ह्यातूनही बाहेर पडता आलं पाहिजे.

कधी आर्थिक संकट येतं, त्यातही खचून नाही गेलं पाहिजे.हे सगळे प्रसंग खूप काही देउन जातात. त्यातलं चांगलं ते घ्यावं. (आर्थिक संकट खूप लोकांचे खरे चेहरे दाखवून जातात बर का!)  ह्या सर्व घडामोडींना तोंड देण्यासाठी गरज असते ती मनाच्या खंबीरपणाची. त्यासाठी सर्वात मोठा आधार म्हणजे देवावर असलेली श्रद्धा. 

या परमेश्वराच्या चरणी सतत मूल होऊन राहावं. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी देवाचे आभार मानावेत, आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी देवापाशी कृतज्ञता राखावी, कारण तो ‘ सर्वदा कर्ता ‘ आहे आणि ही भावना एकदा मनात घट्ट रुजली की अहंकार जडत नाही.मग तो रूप, शिक्षण, पैसा, बुद्धी कशाचाही असो.

हीच तर खरी आयुष्य नावाची शाळा, जिथे माणूस सतत शिकत असतो आणि शिकताशिकता घडत असतो.

@Mrs. Manasi Nikhilesh Godbole. (Ku. Bharati Bhaskar Sathe)

कोविड-१९: शोध आणि बोध

पुढील शतकाचा नारा "एक जग ,एक स्वास्थ्य ,एक भविष्य"

 नमस्कार,  लहानपणी ऐकलेल्या एक छोट्या गोष्टीची सत्यता आता कित्येक दशकानंतर पटते.

आजीबाईंना शिवण कामाची भारी आवड.   ते करताना त्यांना खूप आनंद वाटे . रोज त्या स्वतःच्या झोपडीत तासंतास शिवण काम करीत. एके   दिवशी आजीबाईंची शिवणकामाची सुई झोपडीत हरवली. आजीबाई बेचैन झाल्या! सुई शोधीत शोधीत त्या एका प्रकाशाने झगमगलेल्या मार्केट जवळ आल्या व तिथे सुई शोधू लागल्या. एकाने विचारले,”आजीबाई काय शोधताय?” त्या म्हणाल्या, माझी झोपडीत हरवलेली सुई शोधतेय. गृहस्थ त्यांना   म्हणाले,” झोपडीत हरवलेली सुई तर झोपडीतच मिळेल”. आजीने उत्तर दिले, “इथे प्रकाश भरपूर आहे म्हणून इथे शोधतिये”.

तात्पर्य:  आनंदाचे वास्तविक स्वरूप कोठेअसते ह्याचे ज्ञान होणेआवश्यक.

आनंद आणि सुख हे मानवी जीवनाचे अत्यंत महत्वाचे अंग आहेत. आयुष्यात सर्व खटपट त्यासाठीच असते. गेल्या ३०-४० वर्षात जीवन अति गतिमान झाले आहे. सुखसोयी वाढतच आहेत. इंटरनेट आणि डिजिटल टेकनॉलॉजिने   जग अचंबित झाले. जीवन जगण्याची रीत झपाट्याने बदलत गेली आहे.

जीवन जगण्याच्या रीतींबरोबर मानवाचे ज्ञानेंद्रियरूपी ५ घोडे उधळू लागले आहेत. बाहेरील आकर्षणाने, आपला वेग तुफान करीत तसेच आपल्या परिघाच्या बाहेर दौडत निघाले आहेत. आनंद आणि सुखाची व्याख्या नवीन तंत्रज्ञानासारखी बदलू लागली आहे. अर्थात काही बदल हे अपेक्षीत आहेत.  मनाचे लगाम ताणले जाऊन व त्याची ज्ञानेंद्रियावरील पकड ढिली होऊ लागली आहे.अति ताणाने लगाम क्षीण होऊन निकामी होत चालले आहेत . बुद्धीची मनावरील पकड सुद्धा क्षीण होऊ लागली आहे किंबहुना बुद्धीने चुकीची दिशा दाखवल्याने ज्ञानेंद्रिय रुपी घोडे चुकीच्या दिशेने दौडू लागले आहेत. बुद्धीची सज्ञान [वास्तविक आणि चिरकालीन टिकणारे  ज्ञान ] व अज्ञान [ चुकीचे,भ्रमातून निर्माण झालेले व पोकळ ज्ञान] ह्यातील फरक तपासण्यासाठी वापरण्यात येणारी कसोटीची तीव्रता कमी होत चाललीआहे. निरनिराळ्या माध्यमातून मिळणाऱ्या  काहीवेळा अज्ञानाच्या महापुराने सज्ञान झोकाळून  जात आहे. त्याचा बुद्धीवर परिणाम होऊन ती चक्रावून जात आहे. त्याचा परिणाम म्हणजे जीवात्मा व बुद्धी यातील दुवा कमी होतोय. जीवत्माचे श्रेष्ठत्व जवळ जवळ नाहीसे होत आहे. तो शांतपणे सर्व घटनांकडे  पाहत आहे. अविचारातून प्रेरणा व त्यातून सतत विचार व नंतर वासना असे चक्रात मानवी जीवन अडकत आहे. वासनेचे रूपांतर कर्मात वअकर्माने निसर्गाचे  पतन होऊ लागले आहे. त्यावर उपाय शोधायला वेळ कोणाला?

अश्या परिस्थितीत ध्यान करणे हाच उत्तम मार्ग आहे. ध्यानाने मन शांत होते व बुद्धीला चालना मिळून चांगले विचार सुचतात, जसे अंधार दूर करावयाचा  असल्यास प्रकाश येणे गरजेचे असते तसे.

आता निसर्गाचे कार्य बघू. सूर्य प्रकाश व उष्णता देतो.पवनशक्तीला वेग देतो .  समुद्राच्या  पाण्याचे बाष्पीभवन  करून ते वाऱ्या तर्फे दुर दुर नेतो. पृथ्वीवर पर्ज्यन्य वृष्टी  करवतो. भूतलावरील सर्व जन जीवन साठी अन्न व पाण्याची व्यवस्था करतो. पृथीवरील माती, पाणी तसेच कीटकांमुळे वनस्पती जगतात. कीटक व पक्षांमुळे त्या सर्वीकडे  पसरतात. भूदल हिरवेगार होते व मानवास जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू पुरवतात. किती श्रेष्ठ व सुंदरआहे हा निसर्ग! त्याची सगळी  धडपड पृथ्वीवर शांत व सुमंगल वातावरण निर्माण करण्यासाठी. तेही कुठलीही  अपेक्षा न ठेवता निसर्गाचे   अखंड कार्य चालू असते. आंब्याचे वृक्ष मधुर आंबे देते,  हिरव्यागार  मोहक पानांमुळे छानसावली मिळते. आंब्याचे झाड कधी आंबे  खाते? किंवा आंबे  कोणी खाल्ले ह्याची चौकशी करते? नाही.  निसर्गात कुठलाही  स्वार्थ नाही.  फक्त परमार्थ व श्रेष्ठव दिसते.

गाईच्या दुधात, मातेच्या दूधापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जवळ जवळ तिप्पट असते. ह्याला कारण, गाईच्या बछड्याची वाढ बाळापेक्षा झपाट्याने होते. दुधात हवे असलेले प्रथिने त्या गरजेनुसार असतात. आधुनिक  शास्त्र  हे सांगू शकते . पण ते असे का होते ह्याचे उत्तर शास्त्रात नाही . निसर्गतील अनेक गूढ आधुनिक शास्त्र  सांगू शकत नाही.तेथे शास्त्र कमी पडते. निसर्गाची श्रेष्ठता व महानतेचे दर्शन होते.

हजारो वर्षांपूर्वी ऋषी, महर्षीच्या तपश्चर्येने  निसर्गाच्या माध्यमातुन ध्वनिलहरी तपस्वी पर्यंत पोहोचल्या व त्यातून वेदांत, उपनिषद  सारखे अमूल्य ज्ञान भारतीयांना मिळाले. वेद, भारतीय जीवन पद्धतीच्या, संस्कृतीचे  अविभाज्य घटक बनले. आपल्या पूर्वजांची निसर्गावर  असलेल्या प्रचंड श्रद्धेमुळे शक्य झाले.

कालांतराने निर्सगाचे श्रेष्ठतव कमी होऊ लागले,श्रद्धा घटली व निसर्गाकडे  पाहण्याचा मानवाचा दृष्टिकोन बदलला. मानव त्याकडे उपयुक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्यात  येणारी वस्तू समजू लागला. योगी  विचार कमी होऊन भोगी विचार बळावले.

 चुकीच्या प्रेरणेने अविचार  व नंतर स्वार्थी वासना उत्पन्न झाली.संपत्ती व व्यक्ती स्वातंत्र ह्याला आनंद व सुख असे अज्ञानानी नाव प्रचलित पडले. संपत्तीचा साठा करण्याच्या मागे बुद्धी व शक्ती खर्च होऊ लागली. प्रचंड जंगलतोड,अमर्याद खनिज तेलाचे उत्पादन ,अमर्याद पाण्याचा वापरामुळे निसर्गाचा तोल ढळू लागला. समाजातील विशिष्ट वर्गाने भोगवाद अमर्याद वाढवून,श्रीमंत व गरीब ह्यातील दरी आणखी वाढली. हवेतील  व पाण्यातील  प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले.मातीची रया जाऊ लागली ,वाळवंटाचा पसारा वाढू लागला.  वनस्पती ,प्राणी,पक्षी,जीव,जंतू नष्ट  होऊ लागले. पण त्याची  फिकीर कोणाला? मानव तर पृथ्वीचा ,निसर्गाचा पूर्ण ताबा घेण्याच्या  जय्यत तयारीस लागला. एवढेच नव्हे तर निसर्गाला गुलाम बनविण्याची स्वप्ने बघू लागला. त्याच्या वासना आणि कृत्त्य थांबवायचे तरी कोणी? कसा बदल घडवून आणायचा?

निसर्ग सर्व गोष्टींवर  बारीक नजर ठेवून आपल्या गुणधर्मानुसार शांत  तसाच  गंभीर होता . पृथ्वीवर चाललेले  अधःपतन हे सज्ञानाने दूर होईल अशा आशेवर होता. शेवटी आपलीच लेकरे, ती काळानुसार शिकतील .  आपण त्यांना ज्ञानाचे डोस पाजण्याची आवश्यकता नाही ह्या विचारावर विश्वास ठेवणारा होता .

परंतु भोगवाद वाढतच चालला तो इतका वाढला की झालेली हानी कधीही न भरून येण्याइतकी. हे असेच चालू राहिले तर सर्व मनुष्य ,प्राणी, पक्षी वै. यांचा विनाश अटळ हे निश्चित.

विश्वाचा अंश असलेल्या निसर्गानीआतामात्र पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी थोडा वेगळा विचार करून  तो अंमलात आणण्यास सुरवात केली. फक्त वनस्पती,मनुष्य ,प्राणी, पक्षी वै.यांचा विनाश टाळण्यासाठी.

हळू हळू पृथ्वीचं तापमान वाढू लागले, काही ठिकाणी वादळे,तर कोठे भूकंप व  सुनामीच्या लाटा  समुद्र किनाऱ्यावर थडकू लागल्या. ऋतूंचे चक्र बदलू लागले,अवेळी पाऊस,हिमहृष्टी  होऊ लागली. समुद्राची पातळी वाढली  व जलचर प्राणी ,मासे तसेच जिवाणू ,कोरल्स कमी होऊ लागले.हिमशिखरे बर्फ़ न साठल्याने दिसेनाशी होऊ लागली.जमिनीवरील पावसाचे प्रमाण घटले, नद्या कोरड्या पडू लागल्या, जंगले ओसाड पडू लागली.शेतीचे उत्पादन कमी झाले .स्वाईन फ्लू ,बर्ड फ्लू , इबोला  सारखे विषाणूंचा मुक्तपणे संचार होऊन सर्वांचे स्वास्थ्य बिघडू लागले. ह्याचा परिणाम म्हणजे मानवला आर्थिक, शारीरिक,मानसिक तडाखे सहन करावे. काहींचे जीव गेले तर काहींचे संसार उध्वस्त झाले.निसर्गाचे प्रहार जबरी होते पण त्यामागे मुख्य उद्देश हा झालेल्या चुका सुधारुन,त्यातून काही शिकून जीवनातील सज्ञानतेत भर घालावी, निर्सगाबद्दलआत्मीयता,प्रेम दाखवावे,असा असावा.

कोणाच्या खाण्यापिण्याचा रूढी बद्दल मत व्यक्त करू नये असे आपली संस्कृती सांगते. पण चीनमधील श्रीमंतांच्या आचरट चोचले पुरविण्याच्या व  राक्षसी भक्षण करण्याच्या प्रवृत्तीने सगळ्या जगाचे लक्षण वेधले गेले. कारण अश्या भोगवादी वृत्तीने कोविड-१९ नावाच्या विषाणूने जंगली जनावराच्या शरीरातून माणसाच्या शरीरात प्रवेश केला. बाहेरील जगात मृतावस्तेत असलेला ह्या विषाणू शरीरात घुसून  सर्व रोगप्रतिकारक पेशींवर मात करत, त्याच्या  RNA जिन्सच्या साहाय्याने मानवी रक्त पेशींचे अन्न [प्रोटिएन्स] शोषून त्या नाश करूलागला. काही दिवसातच  कोविड-१९ मनुष्याला मरणाच्या दाढेत नेऊ  लागला.

 कोविड-१९बाधित आलेल्यांच्या संपर्कात तो  झपाट्याने पसरला. चीनच्या सीमा पार करून सर्व  जगभर, १८०देशात  पसरला. वर्ण ,लिंग ,वयाच्या कोठल्याही मर्यादा त्याला रोखू शकल्या नाही. जगभर कोविड-१९ ने  धुमाकूळ घातला व न भूतो न भविष्यती अशी बिकट परिस्थिती निर्माण केली. लाखो जणांचे प्राण गेले,लाखो त्याचे शिकार बनले ,जगातील व्यवहार पूर्णपणे थंडावले,घरात बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आरोग्य सेवा अत्यंत अपुरी पडू लागली, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिची आवश्यकता  आधी कधीच भासली नाही. प्रत्येकाच्या  मानसिक,आर्थिक, चिंता वाढल्या.जे रोज काम धंदा करून सन्मानाने प्रपंच चालवीत, त्या लोकांवर भीक मागायची वेळआली. बऱ्याच सेवाभावी संस्था पुठे सरसावल्या. वैद्यकीय क्षेत्रातील व पोलीस दलातील जनांनी आपले  प्राण पणाला लावून कर्तव्य बजावले  व जनतेकडून  वाहवा मिळवली.

 कोविड-१९आजाराने जगातील सर्व देशांचे किती आर्थिक नुकसान  झाले?किती नोकऱ्या गेल्या? किती मदत कार्यासाठी खर्च झाला ?त्याचा हिशोबच नाही. कोविड-१९  चे वॅक्सीन केव्हा उपलब्ध होणार ह्यावर आत्ता तरी उत्तर नाही.  हा विषाणू जगातून केव्हा कायमचा नाहीसा करावयासाठी त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ  अहोरात्र झटत आहेत. सायन्स कोविड-१९  वर निश्चित मात  करेल.

अणुयुद्धापेक्षा  विषाणू आजाराच्या युद्धाची शक्यता बिल गेट्स यांनी ५ वर्षांपूर्वी आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून मांडली होती. ती आज सत्य म्हणून समोर येत आहे.

कोविड-१९ ने  जगाला  खूप काही शिकविले,प्रदूषण विरहित निसर्गाचे काही प्रमाणात खरे दर्शन घडविले. नद्यांचे स्वच्छ पाणी खळखळ वाहताना अनुभवले .प्राणी, पक्षी आपल्या कक्षेबाहेर भ्रमण करताना आढळले. सर्वाना घरीबसून काहीतरी आवडीचे,वेगळे करण्याची संधी मिळाली . बुद्धीला व मनाला आनंदाची  व्याख्या तपासण्याची संधी मिळाली. ज्ञानेन्द्रियरूपी घोडयाना  थोड्याप्रमाणात का होईना आत्म निरीक्षण करण्याची संधी मिळाली.

करोना तांडवपासून बऱ्याच गोष्टींचा बोध होऊ शकतो,तो असा

वैयक्तिक पातळीवर:

  1. कोविड-१९पूर्णपणे नाहीसा होणार नाही तर ह्या ना त्या रुपाने परत येणार ह्याची मानसिक तयारी ठेवणे आवश्यक होणार आहे. मास्क,सानेट्झर्सचा वापर, सामाजिक योग्यअंतर ठेवणे व शक्य तितके संपर्क कमी करण्यावर भर देणे  ह्यांचे कठोर पालन करावे लागणारआहे.  जीवन पद्धतीत हा मोठा बदलावं आहे. विशेषतः वयस्कर व लहान मुले ह्यांची विशेष काळजी घावी लागणार आहे.
  2. काहींना कोविड-१९ लागण झाली नाही ,तर  काही जण करोना बाधित झाले पण लवकर बरे झाले, त्यातले काही जणांना अतिकाळजी विभागात  ठेवावे लागले तर काही जणांचे प्राण गेले.असे का? ह्याचे उत्तर प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीत आहे .ती २ प्रकारे असते . innate[जन्मापासुन असलेली ] आणि adaptive [जन्मानंतर वाढलेली].भरपूर व्यायाम , योगासने ,चालणे, सायकलिंग ,योग्य आहार याने तिची वाढ होऊ शकते. डॉक्टर कोशी ह्याच्या मते जगातील बरेच जणांची रोगप्रतिकारक शक्तीची मोठया प्रमाणात घट झालेली आहे व ती वाढवणे अत्यंत  गरजेचे आहे. मानसिक तणाव,अतिखानपान,चुकीचे खाद्य , व्यायाम न करणे , वेळेवर न झोपणे, प्रदूषण, हि त्याची करणे आहेत.
  3. कोविड-१९ बद्दल माहिती अधिकृत सुत्रांकडूनच मिळवावी उदा.गव्हर्मेंट वेबसाईट , तसेच प्रसिद्ध टीव्ही  चॅनेल्स.शक्यतो  त्याचा नोंदी  करून ठेवा [मोबाइलला नंबर्स वैगरे]. त्याचा आपणास किंवा इतरांना उपयोग होऊ  शकेल .फेक न्यूज वर अजिबात विश्वास ठेऊ नका. आजारा बद्दल माहिती मिळणवण्यासाठी जास्त वेळ टीव्ही बघण्यात घालवू नये.
  4. ह्या संकट समयी समाजाला आपल्या कडून जेवढी जमेल  तेवढी मदतीची अपेक्षा आहे. आपल्याकडे असलेल्या अनुभव, कलांचा येथे जरूर  उपयोग होऊ शकतो. स्वामी विवेकानंद च्या मतानुसार “दरिद्रीनारायण सेवा हीच ईश्वर सेवा होय”.

सिंगापुर येथून

  1. सिंगापुर  हा देश ५५ लाख वस्तीचे एक बेट. येथील सामाजिक,आर्थिक  व स्वास्थ्य व्यवस्था शिस्तबद्ध असल्याने , कोविड-१९   प्रसार आटोक्यात आणण्यास सरकार ने पूर्ण लॉक डाउन राबवला आहे, सर्वे आंतराष्ट्रीय ये जा बंद ठेवली आहे, त्या मुळे यश मिळत आहे.
  2. येथील कायदे कडक व अमंलबजावणी तत्परतेने होते  व कोविड-१९ आटोक्यात आणण्यासाठी मास्कचा वापर ,शरीराचे तापमान मोजणे, सामाजिक अंतर ठेवणे, घरून काम करणे,शाळेचे वर्ग इंटरनेटच्या माध्यमातून घेणे,फक्त गरजेसाठीच घराबाहेर पडणे अश्याने व्यवहार सुरु  आहेत. बसेस,रेल्वेत शुकशुकाटआहे.
  3. बऱ्याच सामाजिक संस्था मदत कार्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. सरकारने सर्वाना मास्क आणि सानिटीझरचे वाटप केले.

भारताविषयी

  1. कोविड-१९ वर मात करण्यासाठी भारताच्या केंद्रीय सरकार, राज्यसरकार ,सर्व भारतीय नागरिक, विशेषता वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे,पोलीस दले ,सेवाभावीसंथा, मीडिया चे काम अतिशय वाखाणण्यासारखे आहे. भारताची खरी ताकद दिसून आली. सर्वाना माझा सलाम.भारताने  कोविड-१९ वर मात  करण्यासाठी उचललेल्या पावलावर सर्व जगाकडून आदरपूर्वक दखल  घेतली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
  2. पुढील काळात कोविड-१९सारख्या विषाणूची निर्मिती करून काही देश बायलॉजिकल वॉरफेर +शस्त्र वापरून युद्ध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने  जागरूक राहणे आवश्यक आहे. बायोटेक सायन्स हा   संरक्षण विभागाचा एक घटक असावा व ते  तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वार्षिक अंदाजपत्रकात पैसे  बाजूला ठेवावेत.
  3. जगात सर्वात जास्त लसी ह्या  [निरनिराळ्या] भारतात बनविल्या जातात.भारतीय कंपनी ह्या क्षेत्रात अग्रेसर म्हणून समझल्या जातात. कोविड-१९साठी भारतीय कंपन्यांकडून काही विशेष कामगिरीची अपेक्षा जगाकडून आहे. भारताने अशा आजारावर लस निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा म्हणजे सर्वाना लस माफक किंमतीत मिळू शकेल.
  4. आयुष मंत्रायलयातर्फे भारतीय आयुषचे फायदे आणि रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढविता येईल ह्या विषयावर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात सरपंच, नगरसेवकापासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वांचा क्रियाशील सहभाग असावा. कोविड-१९  अनुभवाने मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होऊ शकेल. तसेच भविष्यात अशा आजाराला सामना करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक प्रशिक्षण सर्व सामन्यासाठी देण्याची व्यवस्था करावी.

आंतरराष्ट्रीय

  1. इंटरनॅशनल समिती टॉक्सओनॉमी हि विषाणूं या विषयावर काम करते, त्यांच्या आवाहलाप्रमाणे जगात ५४५० प्रकारचे विषाणू आहेत कि जे माणसांच्या संपर्कात येऊ शकतात. त्यावर मात करावयासाठी जागतिक पातळीवर  प्रयत्न होणे आवश्यक आहे.
  2. कोविड-१९ उगम व त्यामागची कारणे शोधून त्यावर कायमचा उपाय होणे अत्यंत गरजेचे आहे. काही जागतिक पातळीवर कायदे येऊन त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी म्हणजे भविष्य काळात असा प्रचंड उत्पात सहन करावा लागणार नाही. जंगली जनावरांची देवाण घेवाण व त्याचे मांस  खाण्यावर  जगभर पूर्णतः बंदी घालावी. विरॊलॉजिस्टच्या मते जंगली जनावारा मुळे ७५०००० प्रकारचे विषाणू पसरू शकतात  कि ज्यामुळे करोना सारखा आजार भविष्यात परत डोके वर काढू  शकतो .
  3. WHO  तसेच  UNICEF व  इतर स्वास्थ  क्षेत्रात काम करणाऱ्या कोविड-१९  सारखा आजार भविष्यात रोखण्यासाठी दमदार पावले उचलणे आवश्यक आहे .जगातील नावाजलेल्या संशोधन संस्था, विद्यापीठे, सेवाभावी संस्था ह्यांच्या सहकार्याने एकत्र व पूरक असे काम होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय  संस्कृतीत सात्विक आहाराचे महत्व, हात जोडून नमस्कार तसेच मृत्यू नंतर अग्नी देणे ह्या मागे किती खोल व गर्भित अर्थ आहे हे लक्षात येते. 

जागतिक स्तरावर निसर्गाला उच्चस्तम  स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ती एक भोगवस्तू नसून निसर्गाच्या अस्तित्वामुळे मानव जीवित आहे.निसर्गाचे  आपल्यावर अनंत  उपकार आहेत व त्याच्याच सावलीखाली मानवाची  भरभराट होऊ शकेल हे नक्की.

महर्षी पतंजलींनी ५००० वर्ष पूर्वी खालील प्रमाणे सूत्र सांगितले आहे ते असे. 

संतोषाद् अनुत्तमः सुखलाभः

साधनापाद ,सूत्र ४२

संतोषशाने सुख लाभते व त्यापेक्षा उत्तम सुख नाही.  संतोष म्हणजे मन नेहेमी प्रसन्न व आनंदी राखणे. महत्वाकांक्षा   असेल तर सुखाला  तिलांजली द्यावी लागेल कारण तिला अंत नसतो  तसेच  ती पूर्ण करण्यासाठी अतोनात कष्ट भोगावे लागतात, त्यातच सुख मानावे लागेल.

कोविड-१९  पासून सर्व जगाची लवकरात लवकर मुक्तता होवो व सर्वाना भयमुक्त वातावरणात प्रत्येकाचे  जीवनातं उत्कर्ष  होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पुढील शतकाचा नारा ” एक जग ,एक स्वास्थ्य ,एक भविष्य “

राजेंद्र धर्माधिकारी

 

राजेंद्र धर्माधिकारी ,सिंगापुर

प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशिब | जन्म व कर्म गुणसुत्रे

प्रश्न

प्रारब्ध, प्राक्तन, दैव, नशिब यात काही फरक आहे का? असेल तर काय?

थोडक्यात उत्तर

प्रारब्ध आणि प्राक्तन ह्या संज्ञा आहेत ज्या कर्मफळाच्या अवस्था दर्शवतात. दैव आणि नशिब हे भावना वाचक उद्गार आहेत जे मनाच्या अवस्था दर्शवतात. #मा_आ_वि #हिंदू #गूढ_ज्ञान #ज्ञान

मोठे उत्तर

जसे मानवी गुणसुत्र हे दोन प्रथिन मालिकांच्या धाग्याप्रमाणे एकमेकांत गुंतले आहे, तसे कर्म व जन्म हे एकमेकांसोबत अतिशय शास्त्रीय सफाईने गुंतले आहे.

त्यात दोन मुख्य संज्ञा लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • निरुपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ लगेच परिणाम दाखवत नाही व ते विलम्बाने भविष्यात येतात.
  • सोपक्रम कर्म: असे कर्म ज्याचे फळ अवतीर्ण होऊ लागले आहे किंवा वर्तमान कालात घडत आहे.

आता याच्या जोडीला चार उपसंज्ञा लक्षात घेऊ या.

  1. संचित कर्मफळ: एका आत्मन च्या ब्रह्मापासुन वेगळे झाल्यानंतर सर्व कर्मफलांचा एकुण आशय किंवा साठा.
  2. क्रियमाण कर्मफळ: जे आत्म्याने प्रकृती सोबत केलेल्या दररोजच्या कर्मातुन जन्म घेते. यातील काही कर्म ताबडतोब फळ देऊन संपते. उरलेले कर्मफळ संचितात जमा होते.
  3. प्रारब्ध कर्मफळ: हे त्या संचितापैकीत असे कर्मफळ आहे, जे त्या आत्म्याच्या वर्तमान शरीरावर परिणाम करते किंवा करणार असते, जवळच्या भविष्यात, म्हणजेच वर्तमान देहाचा लय किंवा मृत्यु होण्या आधी.
  4. प्राक्तन कर्मफळ: हे त्या संचितापैकी असे कर्म आहे जे त्या आत्म्याच्या पुढल्या म्हणजेच भविष्यातील शरीरावर परिणाम करणार आहे. म्हणजेच त्याआत्म्याला पुन्हा शरीर धारण करायला हे कर्म कारणीभुत आहे.

आता या संज्ञा कशा चालतात ते बघू

एक आत्मन पहिले नवे शरीर घेतो तेव्हा संचित (प्राक्तन + प्रारब्ध) कर्मफ्ळ “शुन्य” घेऊन जन्मतो.

त्या शरीराने प्रकृती सोबतच्या केलेल्या कर्मापोटी क्रियमाण कर्म (लगेच फळ देणारी) भोगतो तसेच संचित कर्मफळे म्हणजेच “निरुपक्रम” कर्मफळे स्वतःवर जोडुन घेतो. त्याच्या नुसार दुसरे नवे शरीर धारण करतो.

आता हे दुसरे नवे शरीर ही संचितापैकी काही प्राक्तन कर्मफळे घेउन जन्म घेते झाले आहे.

या दुसऱ्या नव्या शरीरात आत्मन क्रियमाण कर्म करुन व त्याचे फळ लगेच भोगुन राहतो. त्यावेळेस प्राक्तनातील काही कर्म “सोपक्रम” अवस्थेस पोहोचतात व प्रारब्ध म्हणुन समोर येतात. तो आत्मा ती भोगुन संपवतो, तसेच क्रियमाण कर्म भोगतो. न भोगलेली नविन कर्मफळे संचितात जोडली जातात.

त्यातील काही प्राक्तन म्हणुन पुन्हा सोबत घेऊन तोआत्मान पुढला जन्म व तिसरे नवीन शरीर धारण करतो आणि हे जन्म कर्म चक्र चालु राहते.

आता पुढल्या दोन शब्दांकडे वळु

या सर्व चक्रा मध्ये आत्म्याला शरीर धारण केल्याच्या आनंदात मी पणा येतो व त्यामुळे त्याचे पुर्व जन्म स्मृतीत राहात नाही. त्यामुळे संचित (प्रारब्ध व प्राक्तन) कर्मफळे याची जाण नसते.

त्यामुळे अपेक्षा असताना (जी करणे हेच दुःखाचे कारण सांगितले आहे) फळ मिळाले नाही तर ती अपेक्षा भंगाची भावना “दैव” (समोर असलेले पण भोगता नाही आले असे फळ) म्हणतो.

त्याच प्रमाणे प्रारब्धाच्या परिणामामुळे अपेक्षा नसताना (जे पुर्वीच्या कर्माचे फळ आहे) ते फळ (भोग) वाट्यास आले तर त्याला “नशिब” म्हणतो.

दैव आणि नशिब हे बोली भाषेच्या बदलामुळे आलटुन पालटुन ही वापरले जातात.

मला वेगवेगळ्या पुस्तकातुन वाचुन समजलेला हा सारांश आहे. शास्त्रीय की अजुन काही आहे यावर मला वाद करणे अपेक्षित नाही.

@विभासा

How much duration should I hold a posture of a Step in a Surya Namskar?

Well, most of my friends who picked up doing Surya Namskar (सुर्य नमस्कार) recently had one specific question. After the Sadhak (साधक – practitioner) has gained reasonable maturity in his/er posture of the Steps, naturally this question arises – “what is the duration I should hold the posture?” Is it good to hold for 2 seconds, is it dependent on streching of that position or is it at all good to hold into a postion?

These answer seeking questions are nothing but a sign of good Sadhak of Surya Namskar, who is trying to improve his/er effectiveness. And indeed its a very important question to ask and to know answer for…

Most of us know that Surya Namskar is a Yog (योग) however there is a subtle difference in Surya Namskar and other usual Yog. Surya Namskar is a Progressive Yog (प्रगत योग) meaning there are progression from one Step (आसन) to next one. This series 10 or 12 Steps are linked by transitions. It is the harmony of Sadhak’s actions and breathing during the transition contributes to the effectiveness of Surya Namskar.

There is breathing pattern for each Step. Let say first Step (नमस्कार) Namskar – Sadhak says mantra ॐ मित्राय नम: this releases your breath. Now transition into next Step – Hands streched above head – you will do – “breath in” (पुरक)  slowly till you reach final position. Feel the stretch excatly for the time you need reverse your breath (रेचक – “breath out”), in this case you will start to release breath… Thats point you move to next step. Next Step – हस्तपादासन – hands besides your legs with head touching knees… You will be slowly releasing breath to reach to this position… Hold excatly until your lungs are just about empty … Move to next postion the moment you need to start to breath in… This is breathing pattern of पुरक-रेचक breath-in & breath-out that continues… With one exception at Step 5 – अष्टांगासन. In this Step you observe your inner self by breaking your contact with outer universe. This breathing tehcnique is called कुंभक (hold your lungs steady as a Pot with lid closed) In this Step 5 its बाह्यकुंभक (Empty Pot as you breath-out in Step 4)  you hold without breathing in-out. Be in Step 5 only until you can hold breath without taking in… Move to next Step 6 only when you need to take breath again…

Thus in summary the duration of holding a posture in a Step is directly linked to Sadhak’s ability to control his/er breath and it only improves as Sadhak practices Surya Namskar to reach next level of maturity. This also modulates your breathing as you move into 6th Surya Namskar onwards, when you body is actually creating energy (Heart rate and Lungs action in full throttle)

1) नमस्कार – (अंत:कुंभक) मंत्रोच्चार (रेचक)

2) ताडासन – पुरक

3) हस्तपादासन – रेचक

4) एकपादप्रसरणासन – पुरक

5) दंडासन – रेचक

6) अष्टांगासन – बाह्यकुंभक

7) भुजंगासन – पुरक

8) अधोमुख श्वानासन – रेचक

9) एकपादप्रसरणासन – पुरक

10) हस्तपादासन – रेचक

11) नमस्कार – पुरक, अंत:कुंभक

Surya Namskar is the most simplified Yog that takes less then 15 mins and activates 95% of body muscles… And 5 chakras – depending on Maturity of Sadhak and conditions under which s/he doing it. In short this provides highest efficiency of body muscle activation.

How do I know if I am doing it right?

If you start sweating in 5th or 6th Surya Namskar… You can be sure you are doing it right… By the time you reach 10th your body will be completely wet… And heart rate above 120…

Good luck for your next set of Surya Namskar

@विभासा