
प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढे वैखरी राम आधी वदावा |
सदाचार हा थोर सांडू नये तो |
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ||३||
जगात जे जे चांगलं आहे ते राम तत्त्व आहे
संकल्प चांगला विचार चांगला तर आयुष्य चांगलं
आपण रात्री झोपतो तेव्हा ज्या गोष्टीचा विचार करत असतो तीच गोष्ट दुसऱ्या दिवशी carry केली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच विचारापासून नवीन दिवसाला सुरुवात होते असं मानसशास्त्र सांगतं. तेव्हा कुठच्याही प्रहरी वाईट विचार येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
रात्री झोपताना राम नाम घेतले तर दिवसा आपसूकच रामनामाने सुरुवात होईल.
‘पुढे वैखरी राम आधी वदावा’
म्हणजे काय?
तर वैखरी म्हणजे जिभेचे टोक,
ह्या जिभेच्या टोकावर सतत जर राम नाम म्हणजेच राम तत्त्व म्हणजे पॉझिटिव्ह आणि चांगले विचार, चांगली भाषा असेल तर प्रत्येक आचरण हे कायम सदाचरणच होईल.

मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुद्धी नको रे |
मना धर्मता नीति सोडू नको हो |
मना अंतरी सार विचार राहो || ४ ||
आता याचा अर्थ बघताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत.
एक बाजू राम आहे
तर दुसरी बाजू रावण,
संकल्प म्हणजे राम
विकल्प म्हणजे रावण,
सद्बुद्धी म्हणजे राम
कुबुद्धी म्हणजे रावण.
आजूबाजूला जेव्हा कोणतीही घटना घडते, चांगली अथवा वाईट
त्याचा पहिला आघात हा मनावर होतो. त्यामुळे त्या मनाला स्थिर करा.
अशांत मन काय करते,
वाईट विचार करते, त्यामुळे कर्म देखील वाईट होते.
परंतू मन शांत असेल तर चांगला विचार करेल आणि कृतीदेखील योग्य म्हणजे चांगलीच होईल.
मनामध्ये पापबुद्धी जागृत होऊ नये, त्याने ethics सोडून म्हणजे नीतिमत्ता सोडून वागू नये आणि सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावा हे मनाला सतत सांगावे.
आणि आपल्या अंतरात राम-तत्त्वानेसारासार विचार करावा.


