Archive for the ‘माहिती’ Category

आपटे वाड्यातली पळी — जे मला मिळाले, आणि जे पुढे गेले

भाग १ — जे मला मिळाले, आणि जे पुढे गेले

लोकमान्य आळी, चरई, ठाणे

माझ्या आठवणींची सुरुवात एका छोट्या घरातून होते. लोकमान्य आळी, चरई, ठाणे — आपटे वाडा. बाबांनी नुकतेच घेतलेले छोटेसे नवीन घर. मी तीन-चार वर्षांचा असेन. त्या घराच्या भिंतीत माझ्या बालपणीच्या असंख्य आठवणी आहे. आणि त्या सर्वमध्ये एक ठळक आठवण आहे — ऑगस्ट महिन्यातल्या सत्यनारायण पूजेची.

दर ऑगस्ट, वीस-पंचवीस वर्षे

आमच्या घरात सत्यनारायणाची पूजा हा वार्षिक कार्यक्रम होता. दर ऑगस्ट महिन्यात. सलग वीस-पंचवीस वर्षे. आदल्या दिवसापासून घरात लगबग सुरू व्हायची. आई पहाटे लवकर उठून सर्व तयारी करीत असे मुख्य पदार्थ – सव्वा मापाने रवा, तूप, साखर, दूध यांचा शिरा – जो प्रसाद म्हणून केलेल्याची चव दिव्य पदार्थ खालल्यासारखी कायमची जिभेवर राहते. बाबा चौरंग मांडायचे, तांब्यावर आंब्याचा डहाळा ठेवायचे.

आणि मी बाजूला बसून बघत असे.

काय बोलले जाते आहे ते कळत नव्हते. “श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया…” — हे शब्द माझ्यासाठी नुसता नाद होता. अर्थ नव्हता.

पण त्या नादात काहीतरी होते. आई-बाबांचा आवाज त्या दिवशी वेगळा वाटायचा — जास्त शांत, जास्त खोल. जणू ते कोणाशी तरी बोलत आहेत, आणि ते कोणीतरी खरोखर ऐकते आहे. गुरुजी येऊन पूजा करवून घेत असत. कथा वाचली जायची. साधुवाणी, कलावती, अंगध्वज राजा. मला ती परिकथेसारखी वाटायची.

आणि शेवटी प्रसाद — तो शिरा. आजही त्याचा वास आठवला की आपटे वाड्यातले ते संपूर्ण दृश्य जसेच्या तसे समोर उभे राहते.

त्या वयात मला एकच गोष्ट पक्की कळली होती — या दिवशी आपल्या घरात काहीतरी पवित्र घडते आहे.

मुंज, आणि हातात आलेली पळी

मी दहा वर्षांचा असताना माझी मुंज झाली. आणि त्यानंतरच्या पूजेत बाबांनी माझ्या हातात पळी, भांडे आणि ताम्हण दिले. तो क्षण किती मोठा होता, हे तेव्हा कळले नव्हते. आज कळते. कारण त्या क्षणी नुसती भांडी हातात आली नव्हती — एक जबाबदारी हस्तांतरित झाली होती. आणि सोबत एक भीतीही आली: आपण चुकलो तर?

आई बाजूला बसून सांगत राहायचे.

“आता गंध लाव.”

“आता तुळशीपत्र.”

“अरे, ते डाव्या हाताने नाही.”

चुका व्हायच्या. दुरुस्त व्हायच्या. आणि वर्षानुवर्षे ते सर्व हळूहळू अंगात मुरत गेले. ही आपली शिकवण्याची पद्धत होती — पाहून, चुकून, पुन्हा करून. पुस्तक नव्हते. YouTube नव्हते. फक्त आधीच्या पिढीची उपस्थिती होती.

सिंगापूर — आणि धागा तुटण्याची भीती

वयाच्या तिशी-पस्तिशीत सिंगापूरला स्थलांतर झाले. जन्मभूमी ठाणे. कर्मभूमी सिंगापूर. इथे आल्यावर पहिल्या वर्षीच लक्षात आले की एक गोष्ट मागे राहिली आहे — ती उपस्थिती. पूजा करायची तर कोणाला विचारायचे? आई-बाबा फोनवर आहेत, पण दर मिनिटाला फोन करता येत नाही. पण इथे एक गोष्ट सांगायलाच हवी — आई-बाबांनी हा धागा तुटू दिला नाही. त्यांचे प्रोत्साहन, त्यांची मदत, आणि दरवर्षी “पूजा केलीस ना?” हा प्रेमळ आग्रह — यामुळेच परदेशातही ही परंपरा अखंड राहिली.

त्यांचे प्रोत्साहन, त्यांची मदत, आणि दरवर्षी “पूजा केलीस ना?” हा प्रेमळ आग्रह — यामुळेच परदेशातही ही परंपरा अखंड राहिली.

संपूर्ण चातुर्मास, आणि फोनवरचे पंचांग

सिंगापूरमधल्या पूजेची सिद्धता दोन गोष्टींवर उभी असायची: पहिली — “संपूर्ण चातुर्मास” हे पुस्तक. त्यातले सर्व मंत्र, सर्व विधी. ते पुस्तक म्हणजे माझा आधार. दुसरी — आईचा फोन. आई पंचांग पाहायची. तिथी, नक्षत्र, मुहूर्त काढून द्यायची. फोनवरून सांगायची — “यंदा या तारखेला कर, त्या दिवशी योग चांगला आहे.”

हजारो किलोमीटर दूर असूनही, आईच पूजेचा मुहूर्त ठरवायची.

आणि आजही — २०२६ मध्ये, सर्व तंत्रज्ञान हाताशी असूनही — मुहूर्तासाठी मी आईलाच विचारतो. पंचांग वाचण्याची तिची पद्धत, तिचा अनुभव — याला पर्याय नाही.

२०२२ — Excel आणि रेकॉर्डिंग

२०२२ मध्ये मला एक विचार सुचला. आपल्याकडे जे आहे ते फार मौल्यवान आहे. पण ते फक्त स्मरणात आहे. आणि स्मरण नाजूक असते. म्हणून मी लिहायला बसलो. एका Excel फाईलमध्ये. पायरी क्रमांक, कोणता मंत्र, काय कृती. हळूहळू ती यादी वाढत गेली — शेवटी १४१ पायऱ्या झाल्या. मग वाटले, नुसते लिहून काय उपयोग? मंत्र ऐकायला हवेत. म्हणून स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग सुरू केले. १२८ ऑडिओ फाईल्स.

म्हणून स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग सुरू केले. १२८ ऑडिओ फाईल्स.

ते रेकॉर्ड करताना एक विचित्र, हलवून टाकणारी जाणीव झाली —

मला जे आई-बाबांच्या आवाजातून शिकायला मिळाले, ते मी माझ्या आवाजात पुढच्या पिढीसाठी ठेवतो आहे.

आणि आता, वैदेह

चि. वैदेह लहानपणापासून हे सर्व पाहत आला आहे. अगदी तसेच जसे मी आपटे वाड्यात पाहत होतो. आणि गेली पाच-सहा वर्षे त्याच्या हातून पूजा होते आहे. या महिन्यातही त्यानेच केली. मी बाजूला होतो — जसे माझे बाबा माझ्या बाजूला होते. पण मला जे सर्वात जास्त समाधान देते ते हे नाही की तो पूजा करतो.

समाधान हे आहे की त्याच्या मनाची तयारी आहे.

तो हे कर्तव्य म्हणून करत नाही. त्याला ते करावेसे वाटते. आणि हीच खरी परंपरा — जिथे हस्तांतरण सक्तीने नाही, तर आपुलकीने होते.

चार पिढ्यांचा धागा

आजोबा-आजी → आई-बाबा → नीता-मी → वैदेह.

आपटे वाड्यातल्या त्या छोट्या घरापासून सिंगापूरपर्यंत.

मध्ये कुठेही हात सुटला नाही.

आणि हे सहज घडलेले नाही. यामागे आई-बाबांचे सातत्य आहे, त्यांचे प्रोत्साहन आहे, आणि आईच्या पंचांग-वाचनाचे मार्गदर्शन आहे.

शेवटी

मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो.

कुठलेही पुस्तक, कुठलेही रेकॉर्डिंग, कुठलेही तंत्रज्ञान — आपटे वाड्यातल्या त्या सकाळची जागा घेऊ शकत नाही. आई-बाबांच्या बदललेल्या आवाजाची, आईच्या स्वयंपाकघरातल्या लगबगीची, त्या शिऱ्याच्या वासाची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

पण जे मला मिळाले — ते पुढे जावे, एवढेच.

आपली परंपरा एका पिढीकडून दुसरीकडे हातात हात देऊन चालत आली आहे. आज जगभर पसरलेल्या आपल्या कुटुंबांमध्ये तो हात सुटण्याचा धोका खरा आहे.

आणि म्हणूनच पुढचा प्रश्न उभा राहिला —

जे आपल्या कुटुंबात घडते आहे, ते इतर कुटुंबांपर्यंत कसे पोहोचेल?

त्याबद्दल पुढच्या भागात.

जय जय रघुवीर समर्थ

🕉️ श्री सत्यनारायणार्पणमस्तु 🕉️

— विवेक भास्कर साठे (VivSa)

सिंगापूर

पुढील भाग: “पूजेसाठी — म्हणजे पूजा करण्यासाठी नाही, पूजेला साथ देण्यासाठी”.

टर्निंग पॉईंट

म्हणजे निर्णायक टप्पा जेथून नवे वळण मिळते असा महत्त्वपूर्ण क्षण, कलाटणी देणार क्षण म्हणू आपण हवं तर…
थांबा थांबा घाबरून जाऊ नका आणि असं तर अजिबात वाटून घेऊ नका की आज अचानक एवढे जड शब्द वापरून ही काय ज्ञानाचे डोस पाजणार आहे…

निर्णायक टप्पा म्हणजे टर्निंग पॉईंट हा झाला शब्दशः अर्थ.
पण असे टप्पे आपल्या आयुष्यात अनेकदा येतातच ना,
प्रत्येक वेळी काही अगदी कलाटणी देणारा क्षण किंवा फार मोठी घटनाच असते असं काही जरुरी नाही, की ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणू.
ती एखादी छोटीशी पण विलक्षण बदल घडवणारी घटना असू शकते, जी आपल्या विचारांची दिशाच बदलून टाकते किंवा एखादं वाचनात आलेलं पुस्तक असू शकतं जे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं किंवा कोणी व्यक्ती असू शकते जी जणू सकारात्मकतेने भरलेला झरा असते आणि तिच्या नुसत्या भेटल्याने आपण खूप बदलून जातो, स्वतःला नव्याने उमगतो…
असेच काही स्वतःला बदलायला लावणारे, विचार करायला लावणारे प्रसंग, घटना, पुस्तके, व्यक्ती अलीकडेच आयुष्यात आल्या की ज्यामुळे अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला ओळखण्यात खूप चूक करतो rather अतिशय चुकीच्या व्यक्तीजवळ मनमोकळ करतो, त्यांना आपलं मानतो आणि मग एकदम जोराचा झटका बसून डोळे उघडतात…
सुरुवातीला खूप त्रास होतो अयोग्य व्यक्तीवर विश्वास टाकल्याचा, पण हा अनुभव खूप काही देऊन जातो.

पण अशातच काही नवीन चांगल्या मैत्रिणीही मिळाल्या. त्यातल्या दोघींनी तर मनात खूप खास अशी जागा निर्माण केली.
मुळातच मैत्रीप्रिय स्वभाव असल्याने तशा खास जवळच्या खूप मैत्रिणी आहेतच आयुष्यात, प्रत्येकीची मनात वेगळी जागा, वेगळा कप्पा आणि तो तसा ठेवताच यायला हवा. त्यातच खरी गंमत आहे.
पण या दोन नवीन मैत्रिणीं सोबत खूप वेगळ्याच level चे सूर जुळले,
रोज भेटतात बोलतात असं काही नाही पण जेव्हा समोर येतात तेव्हा full of positive vibes….
त्यामुळे मन एकदम शांत, प्रसन्न आणि आनंदी होतं,
no gossiping just निखळ आनंद.
आधी मी अनेक लोकांच्या वागण्या-बोलण्याचा विनाकारण त्रास करून घेत असे, पण अशा काही मैत्रिणी आयुष्यात आल्यावर लक्षात आलं की आता आपणच आपलं brain boosting करून स्वतःला बदलायला हवं.
मग मन त्रस्त करणारे विचार, व्यक्ती आणि विषय यापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवायला सुरुवात केली आणि हळूहळू जमायला लागलं की हो.
आवडायला लागलं कारण आपला आनंद हा आपल्यावरच अवलंबून असतो आणि तो आपला आपणच शोधायचा असतो.

सुखी तर अनेक जण असतात पण सुख म्हटलं की त्या पाठोपाठ दुःख आलंच. त्यापेक्षा आनंदी राहणं केव्हाही चांगलं, कारण आनंदाला विरुद्ध शब्द नाही

तशी मला काही पुस्तक वाचण्याची खूप अशी आवड नाही, पण ठराविक विषयांची ओढ मात्र खूप आहे, जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
अशातच दादाने सुचवलेले एक पुस्तक वाचनात आले डॉ. प वि वर्तक यांचे पुनर्जन्म हे पुस्तक.
प्रचंड गूढ आणि क्लिष्ट असं वाटणाऱ्या या विषयावर त्यांनी scientific reasoning and examples देऊन पुनर्जन्म, आत्मा-परमात्मा, कर्म-पूर्व कर्म व त्यांचे फळ या अनेक गोष्टी खूप सोप्या करून सांगितले आहे.
खरंच हे पुस्तक परत परत वाचावेसे आहे, प्रत्येक वेळी नवनवीन आणि विलक्षण अर्थ उलगडत गेला,
त्याच्याच जोडीला हिराबाई ठक्कर यांचे कर्माचा सिद्धांत हे देखील वाचले आणि डोक्यात नवीन विचारांचे चक्र सुरू झाले.

ठराविक विषय आणि विचार मनापर्यंत कानापर्यंत पोहोचूच द्यायचे नाहीत अशी सवय केली आणि खूप छान वाटायला लागलं.
Detached attachment ठेवायला सुरुवात केली.

कारण इथे आपण कोणालाच बदलू शकत नाही, जो तो आपापला विधीलिखित घेऊन जन्माला येतो, तो जे वागतो जगतो ते त्याच्या पूर्वकर्मानुसारच,
त्यासाठी दुसरे कोणीच जबाबदार नसते, आपण त्यांना बदलूही शकत नाही आणि कुणाच्या वाट्याचं जगूही शकत नाही, मग त्रास तरी का करून घ्यायचा…
आयुष्यात करण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा विचार करूया, त्याच्यासाठी वेळ देऊ या…

हा असा साधा सोपा बदल मी जर करू शकते तर तुम्ही करू शकता…
बघा एकदा विचार करून ….
तुमच्या पण आयुष्यात असा टर्निंग पॉईंट आला असेलच ना, एखाद्या घटनेच्या, पुस्तकाच्या किंवा व्यक्तीच्या रूपात…
नक्कीच तो उलगडून बघा स्वतःला बदलून बघा

सौ. मानसी गोडबोले.
https://amzn.in/d/56gO9v9 – कर्माचा सिद्धांत

पुण्यसंचय – एक विलक्षण अनुभव

श्रीमद भगवत गीतेचे महात्म्य काय वर्णावे, आपल्या भारतवर्षाच्या हिंदू संस्कृतीत भगवद्गीता हा पवित्र धर्मग्रंथ,
जो मानवी जीवनाचे सार सांगतो, जीवनाच्या अथांग सागरातील दीपस्तंभ जणू !!

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ही गीता सांगितली यात १८ अध्याय – ७०० श्लोक आहेत.
आज जगातील अनेक देशातील अनेक धर्मातील विचारवंतांनी देखील गीतेचे महात्म्य जाणले आहे.

आज आत्ता मी माझ्या आयुष्यातील नुकत्याच घडलेल्या एका अद्भुत अशा अनुभवाविषयी सांगणार आहे.
त्याआधी थोडं आमच्या बाईन बद्दल सांगते, सौ.वंदनाताई कुनकीकर म्हणजे आमच्या बाई, गीता धर्म मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘वेदवाणी गीता संथा वर्ग’ याच्या अध्यापिका. त्यांच्या वर्गात त्या फार सुंदर शब्दात गोष्टी रुपात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे निरूपण करून सांगतात आणि संथा देतात, त्यांच्या ओघवत्या वाणीतून हे सर्व ऐकणे म्हणजे एक विलक्षण अनुभवच आहे. सतत त्यांच्या बोलण्यात असे असते की हे देवाचे कार्य आहे, आपण काहीच करत नसतो, कर्ता करविता जर कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु साक्षात परमेश्वर, तेच आपल्याकडून सर्व काही करवून घेतात, आपण फक्त निमित्त मात्र असतो.
किती हा मनाचा मोठेपणा, याला म्हणतात देवाच्या चरणी मुल होऊन राहणं 🙏🏻🙏🏻🙏🏻

साधारण चार एक वर्षांपूर्वी माझ्या आईने सौ वंदना ताईंचा गीता वर्ग जॉईन केला आणि वर्षभरातच तिची सातशे शलोकांची संपूर्ण संस्कृत गीता कंठस्थ करून झाली. खरंतर वयाच्या साधारण १२-१३व्या वर्षापासून तिची गीता पाठ होतीच परंतु तिने लहानपणीच तोंडात बसलेले सर्व उच्चार पुसून टाकून पाणिनी व्याकरणाप्रमाणे शिकवलेले उच्चार करून पुन्हा गीता नव्याने पूर्ण पाठ केली. तेव्हापासून तिच्या मनात होतच की तिच्या तीनही नातवंडांनी देखील गीता पाठ करावी आणि म्हटल्याप्रमाणे ती कामाला लागली देखील, तिच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे आणि मुलींच्या चिकाटीमुळे उत्साहामुळे माझ्या दोन्ही मुलींची आज संपूर्ण ७०० श्लोकांची संस्कृत मधील गीता पाठ झाली आहे.

22 मार्च 2020 च्या लॉकडाऊन पासून त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली आणि साधारण 23 महिन्यांमध्ये म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची संपूर्ण गीता पाठ झाली.
एप्रिलमध्ये बाईंनी दोघींचा शृंगेरी येथे जाण्यासाठी फॉर्म भरला आणि आजी सोबत त्यांचा नियमित सराव सुरूच राहिला.
अचानक वीस नोव्हेंबरला बाईंचा मेसेज आला की आपल्या क्लासच्या १८ विद्यार्थ्यांचे शृंगेरी येथे शंकराचार्यांसमोर परीक्षा देण्यासाठी नंबर लागले आहेत.
त्यापैकी भैरवी, वेदश्री, लिमये काका, केळकर काका, मिहीर आणि त्याचे आजोबा म्हणजे पित्रे काका या सहा जणांना २९ जानेवारी २०२३ हा रविवार मिळाला आणि एकच धूम उडाली.
सगळ्यात पहिले लिमये काकांनी आम्हा सर्वांचे शृंगेरी येथे जाण्याचे बुकिंग केले, त्यानंतर सतत नऊ आठवडे दर बुधवारी आमच्या ग्रुपची प्रॅक्टिस सुरू झाली.
पहिले आठ बुधवार Shenoy काकूंनी आणि शेवटचा बुधवार बाईंनी प्रॅक्टिस घेतली.
शृंगेरी पोहोचल्यापासून परीक्षेच्या निकालापर्यंत कसं कसं काय काय करायचं, कोणत्या पद्धतीचा पारंपारिक पोशाख घालायचा, शंकराचार्यांसमोर कशा पद्धतीने नमस्कार करायचा, काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे हे सर्व सांगितले.
27 जानेवारीला आम्ही निघालो आणि 28 जानेवारीला उडूपी येथे पोहोचलो, तिथून ट्रॅव्हलर बसने शृंगेरी मठात गेलो.
तिथे त्यांच्याच भक्तनिवास मध्ये परीक्षेला आलेल्या सहा विद्यार्थ्यांना सहा रूम्स मठातर्फेस मिळतात, दोन रात्रीचे वास्तव्य त्यांच्यातर्फे मिळते.
गेलो त्या दिवशी सर्वात पहिले शारदा मंदिरात शारदामातेचे दर्शन घेतले, प्रसादाचे सात्विक भोजन केले.
ऍडमिनिस्ट्रेटर ऑफिसमध्ये परीक्षेचे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट सबमिशन झाले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जानेवारीला दुपारी दोनची परीक्षेसाठी वेळ मिळाली, तसतसं सगळ्यांच्याच मनावरचं दडपण वाढू लागलं,
28 तारीख ला दुपारी आणि 29 ला सकाळी last day revision जशी करतात तसा ग्रुप सराव झाला आणि सगळे परीक्षेला सज्ज झाले.

शारदा मंदिर परिसराच्या पलीकडे तुंगा नदीवरील पूल ओलांडून शंकराचार्यांच्या निवासस्थान परिसरात परीक्षेसाठी नेले जाते आणि सोबत गेलेल्यांना संध्याकाळी पाच वाजल्यानंतर दर्शनासाठी एंट्री मिळते.
जसजसा घड्याळाचा काटा पुढे जाऊ लागला तसतशी हुरहुर वाढत होती, कधी परीक्षा होणार, कशी झाली असेल परीक्षा, आपण आत कधी जाणार, खुद्द शंकराचार्यांसमोर कशी परीक्षा होणार, ती बघायला मिळणार का, त्याचा निकाल काय लागणार असे असंख्य प्रश्न मनात येत होते.
अखेरीस पाच सव्वा पाच च्या सुमारास आम्ही आत गेलो, अतिशय निसर्गरम्य अशा सकारात्मक आणि प्रसन्न ऊर्जा देणाऱ्या त्या परिसरात जाऊन पोहोचलो.
एका वेगळ्याच विश्वात पोहोचण्याचा आस्वाद घेत होतो, सहज फिरताना दिसणारे हत्ती हरणे बघून आनंदून गेलो आणि जगद्गुरु शंकराचार्य यांच्या दर्शन सभागृहात जाऊन बसलो.

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका जगन्नाथ पुरी, शृंगेरी आणि बद्रिकेदार अशी चार पिठे निर्माण केली आहेत. त्यातील शृंगेरी पिठाचे आत्ताचे पिठासीन जगद्गुरु शंकराचार्य यांच्यासमोर आमच्या ह्या सहा विद्यार्थ्यांची क्रमाक्रमाने बोलावून शेवटची परीक्षा झाली.
७०० श्लोकांपैकी कोणत्याही एका श्लोकापासून ते सुरुवात करण्यास सांगतात आणि ते थांब म्हणेपर्यंत विद्यार्थ्याने श्लोक म्हणत राहायचे.
ते बघणे हा एक भन्नाट अनुभव होता, खुद्द शंकराचार्य खूप तल्लीन होऊन मान डोलावून अतिशय आस्वाद घेत गीता म्हणून घेत होते.
या सहाही जणांनी अगदी कॉन्फिडंटली, स्पष्ट, खणखणीत आवाजात, न चुकता गीता म्हणून दाखवली. सर्वांना आशीर्वाद मिळाला.
फायनल एक्झाम पार पडली, सगळेजण उत्तमरित्या उत्तीर्ण झाले.
याची देही याची डोळा साक्षात जगद्गुरु शंकराचार्यांना बघणे, त्यांच्यासमोर होणारी ही परीक्षा अनुभवणे हा सगळा अनुभव काहीतरी अद्भूतच होता.
आम्ही सगळे एकीकडे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा, अंगावर आलेला काटा आणि होणारा आनंद अशा वेगळ्याच मानसिक अवस्थेतून जात होतो.
काहीतरी गेल्या जन्मीची जबरदस्त पुण्याई असेल की ह्या सगळ्याचा योग या जन्मी जुळून आला.

मुलींची दोन वर्षाची मेहनत, आजीची प्रचंड इच्छाशक्ती, बाईंचे मार्गदर्शन, सर्व मित्र परिवाराच्या सदिच्छा या सगळ्यांमुळे हा अमृतानुभव मिळाला. वंदनाताई, लिमये काका काकू, केळकर काका काकू, पित्रे फॅमिली, Shenoy काकू, चारुशीला काकू असा हा एक नवा परिवारच आम्हाला मिळाला.
या सर्वांचा आयुष्यात सहवास लाभणं हा एक पुण्यसंचयच आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचा हा वारसा असाच पुढे नेण्याचे कार्य आपल्या हातून होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
सौ. मानसी निखिलेश गोडबोले.

संस्कारांचा खजिना | आमचा मोदगी वाडा

मोदगी वाडा

आमच्या मोदगी वाड्याबद्दल किती आणि काय काय सांगू!

माझे पणजोबा म्हणजे विष्णु सदाशिव मोदगी (नाना) यांनी १९१९ साली मूळ मालक चौबळ यांच्याकडून ठाणे येथील मध्यवस्तीत जुना मुंबई रस्ता, आत्ताचा वीर सावरकर पथ येथे हा वाडा विकत घेतला. नाना स्वतः वकील. उत्तम शिक्षण, कर्तबगारी, मेहनत आणि प्रामाणिकपणा या गोष्टी अंगी असल्या की आयुष्य संपन्न होत जातं बघा. नाना आणि वहिनी (त्यांची पत्नी म्हणजे माझी पणजी आजी लक्ष्मी मोदगी) यांच्या छत्रछायेत वसंत, वासुदेव, दिगंबर, दिनकर आणि विश्वनाथ ही पाच मुले आणि विमल, कुसुम या दोन मुली पुढे त्यांच्या मावळणकर, उपाध्ये, पिटकर,गाडगीळ आणि वाविकर घरातून आलेल्या सूना आणि जोशी आणि कुलकर्णी हे जावई असे पुढील पिढीतील संसार फुलत गेले. ही सगळी झाली माझ्या आजोबा आणि आजी यांची पिढी.

सासू आणि पाच सुना या १३ खोल्यांच्या आमच्या वाड्यात एकाच घरात आनंदाने नांदल्या, एका चुलीवर प्रसन्न मनाने रांधल्या. आमच्या या वाड्यावर जणू अन्नपूर्णेचा वरदहस्त होता. माजघराच्या बाजूला धान्य साठवण्याच्या दोन खोल्या,स्वयंपाक घरात दूध दही लोणी यांचे भिंतीमध्ये जाळीचा दरवाजा असलेले फडताळ, वरच्या माळ्यावर लोणची मुरांबे हे साठवणीचे पदार्थ ठेवलेल्या बरण्या, माडीवर चढून गेले की डाव्या बाजूला साठवणीचे हळद तिखट इतर मसाले पापड असं सर्व धनधान्यांनी परिपूर्ण असं मोदग्यांच घर. घर नुसतच धनधान्यांनी भरलेलं आणि संपन्न असून चालत नाही, तर मनाचा मोठेपणा, आल्यागेल्या पै-पाहुण्यांचे अगत्य, वडीलधाऱ्यांनी विषयी आदर, त्यांच्या शब्दाला मान, घरातल्या घरातच नव्हे तर कोणातच कधीही आप-पर भावाने न वागणे, सगळ्यांना सामावून घेऊन मिसळून राहणे हे या वाड्यातील संस्कार! त्यामुळेच तर कुरबुरी न होता आणि भांड्यांचा आवाजही न येता पाचही जावा मायेने एकत्र राहिल्या.

त्यानंतर माझ्या आईची पिढी म्हणजे ह्या मोदगी वाड्याच्या वास्तूत फुललेली तिसरी पिढी. पाच जावांची मिळून एकूण बारा मुलं. सहा बहिणी-सहा भाऊ. खरतर एकमेकांची चुलत भावंडं पण सख्ख्याहूनही सख्खी, जीवाला जीव देणारी. पुढे त्यात दुधात जशी साखर मिसळून जावी तशा आल्या सहा सुना (वाघ,शेवडे, राहतेकर, दिघे, आगाशे, नवरे) आणि सहा जावई (साठे, महाजन, साने,वैद्य, धर्म, देशपांडे). सगळेच मोदगी मुळातच हुशार, सुस्वभावी, माणूस म्हणून उत्तम घडलेले आणि प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक. त्यामुळे अर्थातच उच्चशिक्षित, आपल्या आपल्या क्षेत्रात छान प्रगती केलेली ही पिढी.

सुख म्हणजे नक्की काय असतं म्हणतात ना तर सुख म्हणजे मोदगी नावाचा, मोदगी वाड्याचा, पूर्व पिढ्यांच्या संस्कारांच्या वारस्याचा आपण स्वतः एक अंश असणं. तसं पाहिलं तर हा मोदगी वाडा म्हणजे माझं आजोळ आणि त्यामुळेच मनाचा अजून जवळचा आणि अगदी हळुवार कोपरा!

वाड्याचा दिंडी दरवाजा म्हणजे साठे चौबळ आणि मोदगी या तिन्ही वाड्यांमध्ये शिरायचा मुख्य दरवाजा. इथून सरळ आत आले की मागील दारी आणि विहिरीवर जाता येत असे. मागील दारी स्वयंपाक घरातून दार उघडत असे, पण बाहेरून येण्या-जाण्यासाठी मेन रोडवर उघडणारा ओटी वरचा दरवाजा जास्त वापरला जाई. ओटीवरून आत गेले की दारावर चौकटीत कोरलेला गणपती हे सगळ्यांचे श्रद्धास्थान, माजघरात झोपाळा, आजोबांची कामाला बसायची जागा, हिशोबाची पेटी, एका बाजूला बाळंतिणीची खोली आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघर. स्वयंपाक घर म्हणजे आजीच्या मायेचं आणि खाऊचं साम्राज्य. माजघरातून मधोमध वरती जाण्यासाठी जिना. तिकडे दिवाणखाना आणि इतर खोल्या यामध्ये सर्व आजोबांचे आणि पुढे जाऊन मामांचे फुललेले संसार आणि सगळ्यात वरती माळा अशीही तेरा खोल्यांची ही वास्तु. स्वयंपाक घरातून उघडलेल्या मागील दारी भांडी घासायची जागा, परसदारी असलेली दगडी उखळ, मोठा पाण्याचा बंब (तो कधीही रिकामा ठेवायचा नाही) विहिरीवरून पाणी काढले (की ते कधीही बादली रिकामी ठेवायची नाही असे अलिखित नियमच जणू) पुरुषांची आंघोळीची जागा, बायकांसाठी वेगळे न्हाणीघर, पलीकडे म्हशीचा गोठा, त्याच्या मागेच टोपलीचा संडास (नंतर पक्का बांधून घेतला). असा हा आमचा आखीव-रेखीव मोदगी वाडा!

ह्या वाड्यात राहणारी आमची १७ भावंडांची चौथी पिढी. बालपणाची काही वर्ष या वाड्यात आम्ही मनसोक्त जगलो. एखादी सुसंस्कारित वास्तू आपल्या आयुष्यात आपल्याला किती आणि काय काय देऊन जाते हे खरे तर शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तो अनुभव ज्यांना भरभरून जगायला मिळाला असे आम्ही सर्वजण नक्कीच खूपच नशीबवान आहोत!

असा हा सर्वार्थाने परिपूर्ण असा आमचा मोदगी वाडा!

सौ मानसी निखिलेश गोडबोले

खेळ खेळूया – पुन्हा दिवाळीचा किल्ला

किल्ल्यावर कचरा व लिखाण करू नये

लहानणापासून दिवाळीच्या आगमनाची चाहूल बालमनात किल्ला करण्याच्या विचाराने येत असे. दर वर्षी नव्याने किल्ला करणे, त्यावर तटबंदी, बुरूज, तलाव करणे हिरवळ लावणे, रंगकाम करून देखणा किल्ला करणे यासारखी मोठी पर्वणी लहानमनापुढे दुसरी नाही. कॉलेजची काही वर्षवगळता नंतरही किल्ला बनवणे चालू होते.

सिंगापूरात आल्यानंतर पहिली ६-७ वर्ष न चुकता किल्ला बनवीत असे. ८ वर्षांपूर्वीच्या या आठवणी पुन्हा आज ताज्या झाल्या हा मस्त विडीओ पाहून

किल्ला स्वच्छ करायला मी मदत करीन

हा विडिओ माझा नाही. हा बनवणाऱ्याच्या टीमचा हेतू मात्र मला १००% पटतो.

आपण सर्वांनी किल्ला पहायला आवर्जून जावे. आणि तिथे फिरताना ते आपले घर मंदीर किंवा जपून वापरायची जागा हा भाव मनांत ठेऊन त्या भव्य वास्तूची काळजी घ्यावी

बाकी काय करावे करू नये ह्या सुचना आपल्या आपण ठरवाव्यात

चला यावर्षी कोणता किल्ला करताय?

काय म्हणता, खा णी? खाण्यावरच्या म्हणी

प्रश्न विचारणार मराठी माणूस खाण्यावरच्या म्हणी #मा_आ_वि, #म्हणी, #मराठी
खाण्यावरच्या म्हणी

चित्र संदर्भ: बूक माय शो, चित्रपट: हेरा फेरी
चित्र संदर्भ: पंगत मराठी जेवण

तर मंडळी, दोन गोष्टी आपल्या लई म्हणजे लई आवडत्या बघा! मराठी भाषा आणि खाद्यसंस्कृती (शुद्ध मराठीत- खा दा डी). दोन लाडक्या गोष्टी एकत्र आणाव्या असा विचार आला. खाणं आणि निरनिराळ्या खाद्यपदार्थांवरच्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार आठवायला सुरुवात केली. पण कसलं काय, मनात मांडे आणि पदरात धोंडे! कामांच्या व्यापातून वेळ मिळेना.

चार तरी म्हणी लेकाला सांगता येतात का पाहूया म्हणून त्याला विचारलं. पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट. म्हणतो कसा, “आई, तू लिही आणि मला वाचून दाखव. एखादी राहिली तर मी सांगतोच.” म्हटलं वा! हे म्हणजे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा! हा आपला आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार. शेवटी मीच सुरु केलं. तसंही म्हणतात ना, सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी ! बघू तरी किती आठवतात…

म्हणी व त्यात येणारे शब्द जसे खायचे जिन्नस, करायच्या कृती, आणि विशेष शब्द, #मा_आ_वि, #म्हणी, #मराठी
म्हणी व शब्द
  • अचाट खाणे, मसणात जाणे
  • अर्ध्या हळकुंडाने पिवळी
  • असतील शिते, तर जमतील भुते
  • आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते
  • चवलीची (२ आणे) कोंबडी आणि पावलीचा (४ आणे) मसाला
  • आधी पोटोबा, मग विठोबा
  • आधी शिदोरी, मग जेजुरी
  • आपल्याच पोळीवर तूप ओढणे
  • आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे
  • आवळा देऊन कोहळा काढणे
  • ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
  • एकादशी दुप्पट खाशी
  • एखाद्याचा खिमा करणे
  • कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच
  • कानामागून आली आणि तिखट झाली
  • कामापुरता मामा, ताकापुरती आजी
  • कोल्हा काकडीला राजी
  • कोल्ह्याला द्राक्षे आंबट
  • कोंड्याचा मांडा करणे
  • खांडोळी करणे
  • खाई त्याला खवखवे
  • खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी
  • खाऊ जाणे तोच पचवू जाणे
  • खाऊन माजावे, टाकून माजू नये
  • खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे
  • खायला काळ आणि भुईला भार
  • गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली
  • गाढवाला गुळाची चव काय
  • गुळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य
  • घरात नाही दाणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा
  • घरोघरी मातीच्या चुली
  • जिलबीसारखा सरळ माणूस
  • ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी
  • ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी
  • ज्याचे खावे, त्याचे भरावे
  • डोक्यावर मिऱ्या वाटणे
  • तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणीक करून आला
  • तळे राखील तो पाणी चाखील
  • ताकापुरते रामायण
  • ताकाला जाऊन भांडे लपवणे
  • ताकास तूर लागू न देणे
  • तिखटमीठ लावून सांगणे
  • तेल गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं
  • दात आहेत पण चणे नाहीत
  • दुधाने पोळल्यावर ताक फुंकून प्यावे
  • धनगर बसला जेवाया, ताकाबरोबर शेवया
  • धन्याला धातूर, चोराला मलिदा
  • नाकाने कांदे सोलणे
  • नाकाला मिरच्या झोंबणे
  • नावडतीचे मीठ अळणी
  • पडत्या फळाची आज्ञा
  • पाणी पाजणे
  • पी हळद आणि हो गोरी
  • पेराल ते उगवेल
  • बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी
  • बोलाची कढी आणि बोलाचाच भात
  • भांड्याला भांडं लागणे
  • मनात मांडे, पदरात धोंडे
  • मला ना तुला, खीर घाल कुत्र्याला
  • मुंगी होऊन साखर खाणे
  • मूग गिळून गप्प बसणे
  • लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा
  • वड्याचं तेल वांग्यावर
  • शितावरून भाताची परीक्षा
  • शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड
  • सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी
  • साखरेचं खाणार त्याला देव देणार
  • देखला वडा उपास मोडा (नवीन जोडली आहे)

अबब, आपण मराठी माणसं अजून काय काय खातो बघा…

अपमान गिळतो, मार खातो, बोलणी खातो, शिव्या खातो, शेण खातो, पड खातो, वेळ खातो, हार खातो, खार खातो, पैसा खातो, अक्षरं खातो… #मा_आ_वि, #म्हणी, #मराठी

आज फार डोकं खाल्लं का तुमचं

बर तुम्हाला येणाऱ्या म्हणी यात नसतील तर जरूर खाली कमेन्ट मध्ये लिहा .. नक्की जोडून ठेवीन

लेखक: अज्ञात (WhatsApp वरून)

गीता सार

प्रत्येक हिंदूला “श्रीमद् भगवतगीते”च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.

ॐ . कुणी कुणाला सांगितली..???
उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली.

ॐ . कधी सांगितली ???
उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली

ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..???
उ.- रविवार च्या दिवशी…

ॐ. कोणत्या तिथि ला ???
उ.- एकादशी

ॐ. कुठे सांगितली…???
उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर…

ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..???
उ.- ४५ मिनीटे..

ॐ. का सांगितली…???
उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!!

ॐ. किती अध्याय आहेत?
उ.- एकूण १८ अध्याय.. !!!

ॐ. किती श्लोक आहेत?
उ.- ७०० श्लोक

ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..?
उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात..

ॐ. गीते ला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ???
उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने..

ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ???
उ.- भगवान सूर्यदेवला..

ॐ. गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ???
उ.- उपनिषदां मध्ये..

ॐ. गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ???
उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे…

ॐ. गीता चे दूसरे नाव काय आहे…???
उ.- गीतोपनिषद

ॐ. गीतेचे सार काय आहे.. ???
उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे..

ॐ. गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ???
उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४
अर्जुना ने- ८५
धृतराष्ट्र ने- १
संजय ने- ४०
एकूण = ७००

एक हिंदू या नात्याने आपला धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेले याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट लिहिली, आवडल्यास पुढे नक्की अग्रेषित करावी आणि आयुष्यात एकदा तरी भगवतगीता वाचावी.

collected by — Mrs. Aparnaa Paranjape

स एषा गणेशविद्या

देवनागरी लिपीलाच गणेशविद्या असेही म्हणतात.

गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी सर्व जगासाठी, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे सुसंगत लेखन करण्यासाठी अत्यंत सोयीची आहे.

यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही.

या लिपीतील चिन्हे १६ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.

५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह (जोडाक्षरासहित) चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जाण पुरेशी ठरते !

भारतीय भाषांसाठी योजलेल्या गणेशविद्या आधारित लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी अल्प परिचयातून उपलब्ध होणारी चिन्ह संपन्नता आढळत नाही.

गणपतीने म्हणजे देवाने ही वर्ण व्यवस्था नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिच्या आजच्या एका चिन्हित रूपाला देवनागरी लिपी म्हणतात.

या वर्ण व्यवस्थेचा उगम गणपतीच्या हातूनच कसा झाला याबाबत पुढील एक आख्यायिका प्रचलित आहे !

महर्षी व्यासांना महाभारत हे महाकाव्य लिहायचे होते ! ते वेगाने लिहून होण्यासाठी त्यांनी श्रीगणेशाला लेखनिक होण्याचे आवाहन केले !

गणपतीने हे आवाहन मान्य करताना एक अट घातली. गणपतीने लिहायला प्रारंभ केला की, त्याचे लिखाण सतत सुरू राहील. ही अट पूर्ण करायला महर्षी व्यासांना सतत महाभारताची कथा सांगत रहावी लागणार होती. ही कथा सांगताना गणपतीने घातलेली अट पाळतानाही आपल्याला अधूनमधून थोडीशी उसंत मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी व्यासांनीही एक युक्ती योजली.

त्यांनी गणपतीला सुचवले की, महाभारत लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी घनिष्ठ संबंध असेल अशी नवी वर्ण व्यवस्था निर्माण करावी आणि त्या वर्णांसाठी स्वतंत्र चिन्हेही निर्माण करावीत तसेच नवी लेखन पद्धती देखील विकसित करावी ! ही नव्याने विकसित केलेली वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी जेणेकरून उच्चार आणि लेखनात सुसंगती येईल.

श्रीगणेशाने व्यासांची ही सूचना मान्य केली. या सूचनेमुळे महाभारत सांगताना व्यासांना अधूनमधून थोडी उसंत मिळणार आहे हे गणपतीच्या लक्षात आले. असे असले तरी मानवाला मानवी शरीराशी जोडलेली नवीन वर्ण व्यवस्था मिळून सर्व पृथ्वीचे कल्याणच होणार असल्याच्या भावनेतून गणपतीने व्यासांची सूचना मनःपूर्वक स्वीकारली !

गणपतीने महाभारत लिहिताना व्यास कथा सांगत असताना त्यांच्या सर्व उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय अवलोकन केले. व्यासांच्या कथनादरम्यान ज्या ध्वनींचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते ध्वनी वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर मानले. ज्या ध्वनींचा संबंध एकेका मानवी मणक्यांशी होता अशा ध्वनींना गणपतीने व्यंजने मानले. स्वर आणि व्यंजने तसेच व्यंजन आणि व्यंजने यांच्या चिन्ह संयोगाने प्रचंड संख्येने स्वतंत्र अक्षरचिन्हे निर्माण होऊ शकतात. जोडाक्षर संकल्पनाही गणपतीनेच वेगवान लिखाणासाठी निर्माण केली असा समज पूर्वापार प्रचलित आहे ! मानवी उच्चारांशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यासाठी ही लिपी उपयुक्त आहे !

कर्नाटकात जन्मलेल्या आणि काशीला आश्रम उभारलेल्या गणेश हेब्बार उपाख्य गणेशशास्त्री यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय लिप्यांची एकात्मता’ आणि ‘भारतीय लिप्यांची मौखिकता’ या दोन पुस्तकामधून पंजाबी, बंगाली, उडिया, असमी, मल्याळम, तमिळ, गुजराती तसेच आज वापरात नसलेल्या पण पूर्वी वापरात असलेल्या आणखी काही भारतीय लिप्या व देवनागरी लिपी यातील साम्य दाखवून दिले आहे !

ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का ? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिपी आहे, याबाबत मात्र आस्तिक आणि नास्तिक दोन्ही समूहांमध्ये बऱ्यापैकी एकमत आहे..

सध्या कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती.

कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्यातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्यासंबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.

शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात.

रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात.

डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे.

सुखकर्ता दुखहर्ता …. या आरतीत ‘दास रामाचा वाट पाहे’ असे लिहून समर्थ रामदासांनी स्वतःची ओळख सूचित केली आहे.

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू अशा ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले आणि विशिष्ट कलाकृती त्यांनीच निर्माण केल्याचे सूचित केले.

देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून केवळ त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे!

ग, ण, श यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे ही बाब लक्षणीय असून ही वर्ण व्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून देवनागरी लिपीला देवनागरीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या कोण्या समर्थकाने या लिपीला गणेशविद्या म्हणले व ते नाव रूढ झाले आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्यात ‘ ए सा गणेशविद्या ‘ असे एक वाक्य येते त्याचा संदर्भ श्रीगणेशानेच देवनागरी लिपीची मूळ वर्ण व्यवस्था निर्माण करण्याशी जोडलेला आहे !

देवनागरी लिपीत १६ स्वर, ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे.

कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते.

ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो.

दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो.

झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो.

घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.

मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत.

मुखाशी संबंधावरून देवनागरी लिपीतील ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने मिळून ३६ वर्णांचे मिळून दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.

वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.

कोणीतरी अभ्यासू व्याकरणकाराने आणि शरीरशास्त्राच्या जाणकाराने कधीतरी देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यात आढळलेला एकास एक संबंध नोंदवून ठेवला आहे. हा एकास एक संबंध म्हणजे ३३ मणके आणि ३३ व्यंजने यांचा परस्पर संबध आहे. मानेच्या खाली पाठकणा सुरू होतो तिथपासून वरून खाली १ ते ३३ क्रमांक मणक्यांना दिल्यास कोणत्या क्रमांकाच्या मणक्याशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जोडलेले आहे हे या संबंधात सूचित केलेले आहे ! हा क्रम लिप्यांचे हौशी अभ्यासक असलेले माझे एक जेष्ठ सहकारी सुधिर नारखेडे यांनी मला उपलब्ध करून दिला. मी त्या क्रमानुसार एक चित्र निर्माण केले आहे.

मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.

कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल.

लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे.

देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू , मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !

लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत.

लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत.

भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वगैरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.

ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते.

अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्‍याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली. काही राजांनी स्वतंत्र राज्याच्या स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र राजचिन्ह याप्रमाणेच स्वतंत्र लिपीही हवी अशा विचाराने अस्मितेचे आणखी एक प्रतीक म्हणून नवी लिपी घडवून घेतली.

देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने अशा विविध कारणांनी विविध नव्या लिप्या निर्माण झाल्या.

अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना जगातील इतर अनेक लिप्यांच्या तुलनेने कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.

१७७७ रु. धनादेशाने देताना रोमन लिपीसह इंग्रजीत one thousand seven hundred seventy seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्त्याहत्तर फक्त ही ११ अक्षरे लागतात.

जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते, त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहितात, १४ ते १९ वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत ७० % वेळ, ७० % शाई वाचते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते.

थोडक्यात, देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे !

देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत, कमी श्रमात लिहिता येतो म्हणून केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर शिक्षण, संशोधन, व्यापार, सेवा उद्योग, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपी आणि मराठी भाषा यांचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत, पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.

देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल.

घरी, बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, प्रत्येक व्यवहारात ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी, समृद्ध, आनंदी होऊ !

ही लिपी सर्व जगाला उपयुक्त असल्याने ‘गणेशविद्या’ बाबतची माहिती देशी,परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे. परदेशी व्यवहारात इतर लिपीसह ही लिपी वापरवी. परदेशातून येणाऱ्या मालावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो तसा भारतीय व्यावसायिकांनी बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, व्यवहारात, पत्रव्यवहारात, वस्तूंच्या वेष्टनावर, आवरणावर देवनागरी लिपी वापरून गणेशविद्येचा प्रसार जगभर करावा !

आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या.

जागतिकीकरणात जगाकडून काही घेताना जगाला चांगले काही देणेही अपेक्षित आहे. जगातील सर्वोत्तम लिपी जगाला देण्यासाठी ‘गणेशविद्या’ चे जागतिकीकरण करू या !

बीजगणिताचे सिद्धांत, शून्याची कल्पना, खगोल, भूमिती, आयुर्वेदिक औषधी, मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्त्व, स्वातंत्र्याची इच्छा, बँकेची कल्पना, न्याय्य कररचना, शेतीसुधारणा, विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय ज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या, जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले.

जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय ‘गणेशविद्या’ जगभर पोचविण्याचे कार्य करतील, असा मला विश्वास वाटतो! आपण सुरुवात तर करू, जग आपले अनुकरण करेल. निवेदक :- प्रा. अनिल गोरे.

सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन;

सदस्य आणि समन्वयक : कृषी परिभाषा उपसमिती, महाराष्ट्र शासन.

सदस्य : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महापालिका;

आजीव सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद;

आजीव सदस्य : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग;

आजीव सदस्य : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, पुणे.

आजीव सदस्य : पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ

आजीव सदस्य : अक्षर मानव

सदस्य : कोथरूड गौरव समिती, पुणे.

निवेदन :- हे पत्रक ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल, संस्था अहवाल, मासिके, पाक्षिके, वार्षिके, त्रैमासिके, अनियतकालिके, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप, सूचना फलक, पाट्या, समाज माध्यमे याद्वारे कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात, परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवावा, ही वैयक्तिक विनंती ! अशा प्रकारे हाच आशय जसाच्या माझ्या नावासह कोणालाही पुढे पाठविण्यास मी या इथेच मुक्त परवानगी देत आहे ! तसेच यातील आशय कोणीही विनामूल्य वापरण्यास माझी सहर्ष संमती आहे !!

हा मजकूर कोठे छापल्यास प्रत पाठवावी. इतर प्रकारे प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती कळवावी, ही विनंती !
अनिल गोरे (संपर्क क्र. : ९४२२००१६७१ )

वी–पत्ता [email protected]

इसा पूर्व ३२० – उत्तिष्ठ भारत:। इसा २०१६ – उत्तिष्ठ “Indian”।


हम से भाग्य शाली है वे जिन्होने इस धारा पर जन्म लिया, जहां स्वर्ग और मुक्ती का द्वार है। ईश्वर भी इन्ही शब्दोमे भारत वर्ष कि महिमा का गान करते है। 

  • पवित्रता त्याग और साहसीयों की भूमी,
  • ज्ञान विज्ञान कला व्यापार व औषधीयोसे परिपूर्ण भूमी,
  • हमारे पूर्वजो कि कर्म भूमी, 
  • जहा दानवी शक्तीयो को दैवी शक्तीयो ने पराजित किया।
  • उत्तुंग शिखरो व सुंदर वनो से आच्छादित भूमी, 
  • पवित्र आनंद शौर्य उत्सर्ग राष्ट्रभक्ती (आदी) श्रेष्ठ गुणो व दया के लिये प्रसिद्ध भूमी, 
  • स्वर्ग से भी श्रेष्ठ भारत भूमी,

और उसी भारत भूमी के उत्थान के लिये अपना सर्वस्व समर्पित करने कि भावना के साथ मा भारती के पुत्र आज अपनी अपनी जन्मभूमी वापस जायेंगे।

पर मै आज यहा से किसी मागध, किसी मालव, किसी लिच्छवी किसी कुरु किसी पांचाल को नही जाने दुंगा, आज यहा से सिर्फ भारतीय जायेगा।

अनेक प्रकार की भाषा बोलने वाले और अनेक प्रकार के धर्मे को धारण करने वाले जन समूहो को भारत भूमी एक घरमे निवास करने वाले सहोदरो के समान धारण करती है। हमारी मातृभूमी राजनैतिक रुपसे अनेक महाजनपदो में बटी अवश्य है पर सांस्कृतिक रूप से वह एक है। एक ही संस्कृती के प्रवाह में मा भारती के पुत्र पल्लवीत हो रहे है। तो जनपदो कि सीमाए उन्हे कैसे बाट सकती है। मै सावधान कर रहा हुं मेरे सामने बैठे भरतपुत्रो को कि जनपदो कि सीमाओं कि आधार पर भारतीयो को बाटने का प्रयास न करे।

संस्कृती के उस सूत्र को संभाल कर रखना जो मानव को मानव से जोडता है। क्यु की देख रहा हुं कि जनपदो कि राजनीती मानव को मानव से तोड रही है। अत: राजनीती के उस दायित्व का निर्वाह अब संस्कृति को करना होगा, संस्कृति को ही सेतू बनाना होगा। 


क्युंकी संस्कृति कोई भाषा नाही संस्कृति कोई जाती नाही है संस्कृति कोई धर्म नाही।

भारतीय अध्यात्म तो दावे के साथ कहता है कि मानव का ईश्वर से एकाकार निश्चित है। पर उससे पहले मानव का मानव से एकाकार तो हो… क्या जनपदो कि सीमाए मानव को मानव से मिलने से रोक सकती है? और यादी ऐसा है तो उन सीमा रेखांओ को मिटाना है जो हमारे हृदयो पर अंकित है। 

जो स्नातक यहा से जाये जो जितने जोर से हो सके गाये हमारी सांस्कृतिक एवं राष्ट्रीय एकता का स्वर, समवेत स्वर… ताकी गुरुकुल के आचार्यो को विश्वास हो के उन्हो ने एक राष्ट्र का निर्माण किया है उसे खंड खंड में बाटा नही है।

मा भारती तुम्हारा मार्ग प्रशस्त करे, उत्तिष्ठ भारत:।

Following current Uri Attacks and rapid spread of diplomatic 

चंपा साम्राज्य — हरविलेली हिंदु साम्राज्य अर्थात आमची इतिहासाबद्दलची बेदरकारी — लेखांक चौथा

हरविलेली हिंदु साम्राज्य अर्थात आमची इतीहासाबद्दलची बेदरकारी——–लेखांक ४

चंपा हया नावाचे हिंदु साम्राज्य सध्याच्या दक्षीण व्हिएट्नाममध्ये होते हे साधारण आपल्या देशातल्या फ़ार फार कमी लोकांना माहीती असते,ते कुठे होते हे माहीत असणे दूरची गोष्ट. हे राज्य अथवा हा राज्यसमूह हा हिंदु साम्राज्याचे पूर्वेचे जवळ जवळ टोक होते.जिज्ञासूसाठी मी या राज्याच्या नकाशाची लिंक खाली देत आहे.

या राज्याचे नाव इतीहासात चिनी कागदपत्रात [भारतात आम्ही इतीहास हा कागदपत्रांवर नाही भ्रामक आणि खूळचट समजुतींवर आधारतो.] साधारण इ.स. १९२ च्या आसपास येते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात खू लिएन नावाच्या एका स्थानीक राजाने चीनी सम्राटांविरुध्द बंड करुन हिंदु धर्म स्विकारला आणि चंपा राजवटीची घोषणा केली.
उत्तर व्हिएट्नाम हा चीनच्या अधीपत्याखाली होता त्यामुळे या राज्याच्या चीनी सम्राटांशी सतत लढाया चालू होत्या. दूसरया ते सातव्या शतकात या राज्याबद्दल फार माहिती नाही. यांची राजधानी सुरवातीला सिंहपुर येथे होती.या राजवटीच्या ४ थ्या शतकापर्यंत च्या राजांची संस्कृत नावे इतिहासाला माहित नाहीत, चिनी नावे आहेत.
या काळात यांनी बरेच बांधकाम केले आणि विष्णूची मंदीरे बांधली.हे लोक मलाई-पालिनेशियन वंशसमुहाचे होते.यांना “चाम,चम अथवा त्सयाम ” वंशसमूह म्हणत आणि त्यांची भाषाही चम भाषा होती.
इ.स.चवथ्या शतकातल्या चम भाषेतल्या शिलालेखात लिहीले आहे की महर्षी भृगुच्या कूळातल्या ब्राह्मणांनी समुद्र मार्गाने येउन या लोकांना वेदिक धर्माची दिक्षा दिली.

चिनी दरबारातल्या कागदपत्रात हे राज्य आपल्या सीमा सतत वाढवत असल्याचा उल्लेख आहे.हा गणराज्यांचा समुह होता आणि यातली नावारुपाला आलेली शहरे होती १] इंद्रपुरी २] अमरावती ३] विजया ४] कुठार ५] अतीशय आश्चर्यजनक नाव म्हणजे ” पांडूरंग ” .या पांडूरंग गावाचे आजचे व्हिएट्नामी भाषेतले नाव आहे “पान रंग “.

इ.स. ३/४ शतकात वैष्णव पंथाचा त्याग करुन हे लोक शैवपंथी झाले.इ.स. ४ थ्या शतकात यांचा प्रसिध्द राजा भद्रवर्मन होउन गेला.याच्या कारकीर्दीतले बरेच चम शिलालेख आहेत.शिव-ऊमा यांची उपासना होती. लोक विटांच्या घरात रहात ,कान टोचत, राजे लोक हत्तीवर जात आणि त्यांच्या डोक्यावर छ्त्र असे. लग्न हे दर महिन्याच्या अष्टमीला होत असे.मनुष्य मेल्यावर त्याचे दहन आणि अस्थीविसर्जन होते असे. जातिभेदाचा उल्लेख नाही. हे चम लोक फार चांगले नौका बांधणी कारीगर होते.या राज्यात बांधलेल्या नौका या चीन, दक्षीण भारत,लन्का, बर्मा, थायलंड, इंडोनेशिया इ. ठिकाणी निर्यात होत.

इ.स.४ थ्या शतकात संस्कृत शिलालेखही आढळायला सुरवात होते.भगदत्त नावाच्या राजाचा उल्लेख इ.स.५१६ मध्ये आहे.या राजाची राजधानी इंद्रपुरी होती,आणि त्याच्या दरबारी भारतातून आलेले असंख्य ब्राह्मण होते असा उल्लेख आहे.
इ.स. ८७५ मध्ये इंद्रवर्मन (२) या राजाने हिंदु धर्माचा त्याग करुन बौध्द धर्म स्विकारला.

इ.सनाच्या ९/१० शतकात ही राज्ये वैभवाच्या शिखराला होती. व्हिएटनाम मधल्या माई सोन या गावापाशी या राजवटीने बांधलेला देउळ समुह आहे हा कंबोडियातल्या अंगकोर वाट पेक्षा लहान आहे पण शिल्पकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. इंटरनेट्वर याचे फोटो बघा,फार सुंदर आहेत.

इ.स. ९७५ मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या अनेक युध्दात पराभव झाल्यावर या राजांनी इंद्रपुरी सोडून आपली राजधानी दक्षीणेला विजया इथे हलविली. १०२१,१०२६ आणि १०४४ मध्ये उत्तरेशी युध्दे झाली त्यात पराभव झाल्याने हे राज्य अजुन संकोच पावले आणि यानी आपली राजधानी “पांडूरंग” इथे हलविली.या काळात राजा रुद्रवर्मन होता. या सर्व कालखंडात आपल्या रीतीप्रमाणे हे राज्य शेजारच्या हिंदु कंबोडियाशी लढण्यात धन्यता मानत होते.

इ.स.च्या १० शतकात शैव पंथ पुन्हा या राज्याचा धर्म झाला. यांचा भारताशी संबध आणि संपर्क साधारण ७ व्या शतकातच तूट्ला होता १३०७ मध्ये जय सिंहवर्मन राजाने आणखी मुलुख गमावला. १४०६ मध्ये चंपाधिराय या राजाचा व्हिएट्नामने पराभव करुन ३ प्रांत जिंकून घेतले. चंपा राज्याचा शेवटचा मोठा राजा हा ” चे बुंगा” होता. आपला संपर्क तूटल्याने याचे खरे नाव इतिहासाला अज्ञात आहे. याने चंपा आपल्या अधिअपत्याखाली इ.स. १३६० ते १३९० मध्ये एकत्र केला आणि व्हिएट्नामचा पराभव करत थेट सध्याच्या हनोई पर्यंत धडक मारली.

१४४६ पासुन व्हिएट्नामच्या फौजांनी या राज्याला पराभुत करायला सुरुवात केली.१४७० मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या युध्दात या राज्याचा पूर्ण पराभव झाला.विजयानगरी नष्ट झाली आणि व्हिएटनामी लोकांनी ६०,००० चम लोकांची कत्तल केली. यानतंर रडत खडत व्हिएट्नामच्या ताब्यातले एक संस्थान म्हणून हे राज्य पांडूरंग या गावी इ.स. १८३२ पर्यंत अस्तित्वात होते.

इ.स. च्या १५ व्या शतकात या राज्यातले बहुसंख्य लोक शातंतापूर्वक मुस्लिम झाले. या मुस्लिम झालेल्या राजांची पदवी तरीही ” शक्तीराय ” होती. मला नाही वाट्त या १८३२ पर्यंत अस्तीत्वात असलेल्या राज्याशी कोणी भारतियांनी संपर्क साधला असेल.

अर्थात जो समाज अमाप कर्तुत्वाच्या पहिल्या बाजीरावासारख्या पुरुषाचा मस्तानीपासुन झालेल्या समशेर बहाद्दरचे उपनयन करायला नकार देउन त्या वंशाला बांद्याचे नवाब बनवतो आणि एका कर्तुत्ववान पुरुषाचा वंश परधर्मात जाउ देतो त्या समाजाकडून काय अपेक्षा ठेवणार.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजुनही या चम लोकांमध्ये थोडे हिंदु लोक आहेत. विश्व हिंदु परीषदेच्या विश्वपणामध्ये ह्या हरवलेल्या आणि उरलेल्या थोड्या काही चम हिंदु बांधवाशी संपर्क साधणे आले तर किती बरे कारण या राजवटीची दप्तरे पांडुरंग या गावामध्ये म्युझीयममध्ये आहेत त्याचा अभ्यासही जरुरी आहे. मला राहुन राहुन एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की हा असा वैभवशाली इतिहास अभ्यासायचे सोडून आपला समाज स्वामींच्या चरीत्राची पारायणे करण्यात धन्यता का मानतो.
आमच्या समाजाला स्वतःचा नाश होतांना दिसत नाही का? का आमची बुध्दी,आमची प्रज्ञा,आमचे भविष्याचे ज्ञान या सगळ्याला धर्म आणि देश संरक्षण यासाठी विज्ञाननिष्ठ तल्लख बुध्दी लागते हे का दिसत नाही अथवा ती बुध्दी सध्याच्या काळात आर्थीक तलवार असते हे सत्य का दिसत नाही!!

रस्ते स्वच्छ ठेवा,जागोजागी थुंकु नका,झाडे लावा, वाह्तुकीचे नियम पाळा या साध्यासाध्या गोष्टींऎवजी शनीवारी मारुतीला तेल कुठल्या पळीने वाहावे, सिध्दीविनायकाच्या उंदराच्या कानात नवस का बोलावा इ. गोष्टी या समाजाला चर्चा करायला कशा आवडतात हे माझ्या अल्पमतीला खरोखरच कळत नाही.

खर्या हिंदु धर्माने आपल्या प्रज्वलित बुध्दीच्या उजेडाने शेकडो वर्षे हा भारत देश आणि आजुबाजुच्या देशांचा आसमंत उजळून टाकला होता हे चिरतंन सत्य कधी आपण ओळखणार आहोत.

(श्री अजित पिंपळखरे यांच्या परवानगीने)