पुण्यसंचय – एक विलक्षण अनुभव

श्रीमद भगवत गीतेचे महात्म्य काय वर्णावे, आपल्या भारतवर्षाच्या हिंदू संस्कृतीत भगवद्गीता हा पवित्र धर्मग्रंथ,
जो मानवी जीवनाचे सार सांगतो, जीवनाच्या अथांग सागरातील दीपस्तंभ जणू !!

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला ही गीता सांगितली यात १८ अध्याय – ७०० श्लोक आहेत.
आज जगातील अनेक देशातील अनेक धर्मातील विचारवंतांनी देखील गीतेचे महात्म्य जाणले आहे.

आज आत्ता मी माझ्या आयुष्यातील नुकत्याच घडलेल्या एका अद्भुत अशा अनुभवाविषयी सांगणार आहे.
त्याआधी थोडं आमच्या बाईन बद्दल सांगते, सौ.वंदनाताई कुनकीकर म्हणजे आमच्या बाई, गीता धर्म मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘वेदवाणी गीता संथा वर्ग’ याच्या अध्यापिका. त्यांच्या वर्गात त्या फार सुंदर शब्दात गोष्टी रुपात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे निरूपण करून सांगतात आणि संथा देतात, त्यांच्या ओघवत्या वाणीतून हे सर्व ऐकणे म्हणजे एक विलक्षण अनुभवच आहे. सतत त्यांच्या बोलण्यात असे असते की हे देवाचे कार्य आहे, आपण काहीच करत नसतो, कर्ता करविता जर कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु साक्षात परमेश्वर, तेच आपल्याकडून सर्व काही करवून घेतात, आपण फक्त निमित्त मात्र असतो.
किती हा मनाचा मोठेपणा, याला म्हणतात देवाच्या चरणी मुल होऊन राहणं 🙏🏻🙏🏻🙏🏻

साधारण चार एक वर्षांपूर्वी माझ्या आईने सौ वंदना ताईंचा गीता वर्ग जॉईन केला आणि वर्षभरातच तिची सातशे शलोकांची संपूर्ण संस्कृत गीता कंठस्थ करून झाली. खरंतर वयाच्या साधारण १२-१३व्या वर्षापासून तिची गीता पाठ होतीच परंतु तिने लहानपणीच तोंडात बसलेले सर्व उच्चार पुसून टाकून पाणिनी व्याकरणाप्रमाणे शिकवलेले उच्चार करून पुन्हा गीता नव्याने पूर्ण पाठ केली. तेव्हापासून तिच्या मनात होतच की तिच्या तीनही नातवंडांनी देखील गीता पाठ करावी आणि म्हटल्याप्रमाणे ती कामाला लागली देखील, तिच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळे आणि मुलींच्या चिकाटीमुळे उत्साहामुळे माझ्या दोन्ही मुलींची आज संपूर्ण ७०० श्लोकांची संस्कृत मधील गीता पाठ झाली आहे.

22 मार्च 2020 च्या लॉकडाऊन पासून त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली आणि साधारण 23 महिन्यांमध्ये म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची संपूर्ण गीता पाठ झाली.
एप्रिलमध्ये बाईंनी दोघींचा शृंगेरी येथे जाण्यासाठी फॉर्म भरला आणि आजी सोबत त्यांचा नियमित सराव सुरूच राहिला.
अचानक वीस नोव्हेंबरला बाईंचा मेसेज आला की आपल्या क्लासच्या १८ विद्यार्थ्यांचे शृंगेरी येथे शंकराचार्यांसमोर परीक्षा देण्यासाठी नंबर लागले आहेत.
त्यापैकी भैरवी, वेदश्री, लिमये काका, केळकर काका, मिहीर आणि त्याचे आजोबा म्हणजे पित्रे काका या सहा जणांना २९ जानेवारी २०२३ हा रविवार मिळाला आणि एकच धूम उडाली.
सगळ्यात पहिले लिमये काकांनी आम्हा सर्वांचे शृंगेरी येथे जाण्याचे बुकिंग केले, त्यानंतर सतत नऊ आठवडे दर बुधवारी आमच्या ग्रुपची प्रॅक्टिस सुरू झाली.
पहिले आठ बुधवार Shenoy काकूंनी आणि शेवटचा बुधवार बाईंनी प्रॅक्टिस घेतली.
शृंगेरी पोहोचल्यापासून परीक्षेच्या निकालापर्यंत कसं कसं काय काय करायचं, कोणत्या पद्धतीचा पारंपारिक पोशाख घालायचा, शंकराचार्यांसमोर कशा पद्धतीने नमस्कार करायचा, काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे हे सर्व सांगितले.
27 जानेवारीला आम्ही निघालो आणि 28 जानेवारीला उडूपी येथे पोहोचलो, तिथून ट्रॅव्हलर बसने शृंगेरी मठात गेलो.
तिथे त्यांच्याच भक्तनिवास मध्ये परीक्षेला आलेल्या सहा विद्यार्थ्यांना सहा रूम्स मठातर्फेस मिळतात, दोन रात्रीचे वास्तव्य त्यांच्यातर्फे मिळते.
गेलो त्या दिवशी सर्वात पहिले शारदा मंदिरात शारदामातेचे दर्शन घेतले, प्रसादाचे सात्विक भोजन केले.
ऍडमिनिस्ट्रेटर ऑफिसमध्ये परीक्षेचे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट सबमिशन झाले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जानेवारीला दुपारी दोनची परीक्षेसाठी वेळ मिळाली, तसतसं सगळ्यांच्याच मनावरचं दडपण वाढू लागलं,
28 तारीख ला दुपारी आणि 29 ला सकाळी last day revision जशी करतात तसा ग्रुप सराव झाला आणि सगळे परीक्षेला सज्ज झाले.

शारदा मंदिर परिसराच्या पलीकडे तुंगा नदीवरील पूल ओलांडून शंकराचार्यांच्या निवासस्थान परिसरात परीक्षेसाठी नेले जाते आणि सोबत गेलेल्यांना संध्याकाळी पाच वाजल्यानंतर दर्शनासाठी एंट्री मिळते.
जसजसा घड्याळाचा काटा पुढे जाऊ लागला तसतशी हुरहुर वाढत होती, कधी परीक्षा होणार, कशी झाली असेल परीक्षा, आपण आत कधी जाणार, खुद्द शंकराचार्यांसमोर कशी परीक्षा होणार, ती बघायला मिळणार का, त्याचा निकाल काय लागणार असे असंख्य प्रश्न मनात येत होते.
अखेरीस पाच सव्वा पाच च्या सुमारास आम्ही आत गेलो, अतिशय निसर्गरम्य अशा सकारात्मक आणि प्रसन्न ऊर्जा देणाऱ्या त्या परिसरात जाऊन पोहोचलो.
एका वेगळ्याच विश्वात पोहोचण्याचा आस्वाद घेत होतो, सहज फिरताना दिसणारे हत्ती हरणे बघून आनंदून गेलो आणि जगद्गुरु शंकराचार्य यांच्या दर्शन सभागृहात जाऊन बसलो.

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका जगन्नाथ पुरी, शृंगेरी आणि बद्रिकेदार अशी चार पिठे निर्माण केली आहेत. त्यातील शृंगेरी पिठाचे आत्ताचे पिठासीन जगद्गुरु शंकराचार्य यांच्यासमोर आमच्या ह्या सहा विद्यार्थ्यांची क्रमाक्रमाने बोलावून शेवटची परीक्षा झाली.
७०० श्लोकांपैकी कोणत्याही एका श्लोकापासून ते सुरुवात करण्यास सांगतात आणि ते थांब म्हणेपर्यंत विद्यार्थ्याने श्लोक म्हणत राहायचे.
ते बघणे हा एक भन्नाट अनुभव होता, खुद्द शंकराचार्य खूप तल्लीन होऊन मान डोलावून अतिशय आस्वाद घेत गीता म्हणून घेत होते.
या सहाही जणांनी अगदी कॉन्फिडंटली, स्पष्ट, खणखणीत आवाजात, न चुकता गीता म्हणून दाखवली. सर्वांना आशीर्वाद मिळाला.
फायनल एक्झाम पार पडली, सगळेजण उत्तमरित्या उत्तीर्ण झाले.
याची देही याची डोळा साक्षात जगद्गुरु शंकराचार्यांना बघणे, त्यांच्यासमोर होणारी ही परीक्षा अनुभवणे हा सगळा अनुभव काहीतरी अद्भूतच होता.
आम्ही सगळे एकीकडे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा, अंगावर आलेला काटा आणि होणारा आनंद अशा वेगळ्याच मानसिक अवस्थेतून जात होतो.
काहीतरी गेल्या जन्मीची जबरदस्त पुण्याई असेल की ह्या सगळ्याचा योग या जन्मी जुळून आला.

मुलींची दोन वर्षाची मेहनत, आजीची प्रचंड इच्छाशक्ती, बाईंचे मार्गदर्शन, सर्व मित्र परिवाराच्या सदिच्छा या सगळ्यांमुळे हा अमृतानुभव मिळाला. वंदनाताई, लिमये काका काकू, केळकर काका काकू, पित्रे फॅमिली, Shenoy काकू, चारुशीला काकू असा हा एक नवा परिवारच आम्हाला मिळाला.
या सर्वांचा आयुष्यात सहवास लाभणं हा एक पुण्यसंचयच आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचा हा वारसा असाच पुढे नेण्याचे कार्य आपल्या हातून होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
सौ. मानसी निखिलेश गोडबोले.

यावर आपले मत नोंदवा